
जुलै महिन्यात अनेक गोष्टींचे नियम बदलणार आहे. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई 29 जूनपासूनच आली आहे. गॅस सिलेंडर, क्रेडिट कार्डपर्यंत अनेक सेवांमध्ये बदल दिसेल. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर दिसू शकतो.

1 जुलैपासून मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटीच्या नियमात बदल होत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने TRAI ने सिम फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम आणले आहेत. नवीन सिम खरेदी केल्यानंतर पुढील सात दिवस तुम्हाला ते पोर्ट करता येणार नाही. सेवा पुरवठादार कंपनी बदलता येणार नाही.

जुलै महिन्यात तुमचे मोबाईल बिल पण वाढू शकते. मोबाईल रिचार्ज केल्यावर जास्त पैसे द्यावे लागतील. कारण रिलायन्स, जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपन्यांनी त्यांचा टेरिफ वाढवला आहे.

प्रत्येक महिन्याच्य पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडर आणि एटीएफच्या किंमतीत बदल करतात. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले नाही. आता निवडणुका झाल्याने 1 जुलै रोजी त्यात काय बदल होतो, हे समोर येईल.

1 जुलैपासून क्रेडिट कार्ड बिल पेमेंटचे नवीन नियम लागू होतील. यामध्ये सर्व बँकांचे क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम द्वारे प्रक्रिया करण्यात येतील. अर्थात बँकांनी या निर्देशांचे अजून पालन केलेले नाही. आतापर्यंत केवळ 8 बँकांनी BBPS वर बिल पेमेंट सक्रिय केले आहे.

जर पंजाब नॅशनल बँकेत तुमचे खाते असेल आणि त्याचा अनेक दिवसांपासून वापर नसेल तर असे खाते 1 जुलैपासून काम करणार नाही. 30 एप्रिल 2024 रोजीपूर्वी ज्या खात्यांचा तीन वर्षांत कधीच वापर झाला नाही. ती खाती जर एका महिन्यात बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी 30 जून 2024 ही डेडलाईन होती.