बर्ड फ्लूचा कहर, 4 लाख कोंबड्या आणि 24 लाख अंडी नष्ट, केंद्रीय पथक होणार दाखल…
नंदूरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूने कहर केला असून आता पर्यंत तिसऱ्या येथे बर्ड फ्लुचा शिरकाव झाला आहे. काय आहे नेमकी येथील परिस्थिती पाहूयात....

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे. आतापर्यंत ४ लाख ६ हजार कोंबड्या आणि कलिंग २४ लाख ९१ हजार अंडी आणि मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.या मोठ्या नुकसानीची केंद्र सरकारने दखल घेतली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. पाहूया यावरील टीव्ही ९ मराठी चॅनलचे प्रतिनिधी जितेंद्र बैसाणे यांचा सविस्तर रिपोर्ट..

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. नवापूरमधील ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय पथक आता पुढच्या आठवड्यात नवापूरमध्ये दाखल होणार आहे.लाखोंची अंडी आणि खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आल्याने पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांनी अधिक मदतीची मागणी केली आहे.

नवापूरमधील हा बर्ड फ्लूचा हा तिसरा प्रादुर्भाव असून यापूर्वी २००६ आणि २०२१ मध्येही अशा घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका दिला आहे. आतापर्यंत ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, या बाधित फार्मच्या परिसरातील १५ पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

बाधित पोल्ट्री फार्ममधील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असून, प्रति कोंबडी १४० रुपये, प्रति अंडे ४ रुपये आणि प्रति किलो खाद्यपदार्थासाठी २५ रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी पक्षी नष्ट केले आहेत, त्या परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त संजय खाचने यांनी म्हटले आहे.

बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाची आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आता केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून पुढील उपाययोजना आणि मदतीबाबत काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.