
70 आणि 80 च्या दशकात अभिनेते ‘जीवन’ (Jeevan) यांचे नाव चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय खलनायकांमध्ये गणले जात होते. आज (24 ऑक्टोबर) जीवना यांची 106वी जयंती आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या कदचीत तुम्हाला माहितही नसतील...

1915मध्ये जीवन यांचा जन्म काश्मीरमध्ये झाला. त्यांचे खरे नाव ओंकार नाथ धर (Omkar Nath Dhar) होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. जीवना यांचे कुटुंब बरेच मोठे होते. त्यांना 24 भावंडे होती. जीवन यांच्या जन्मावेळीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. जीवन 3 वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र देखील हरपले.

जीवन एका अशा कुटुंबातील होते जिथे त्यांना अभिनयाची परवानगी नव्हती. त्यामुळे जीवन घरातून पळून गेले आणि वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 26 रुपये होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

नोकरीची गरज होती म्हणून ते स्टुडिओत काम करू लागले. हा स्टुडिओ मोहनलाल सिन्हा यांचा होता. मोहन लाल हे त्या काळातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक होते. जेव्हा मोहनलाल यांना जीवन यांना अभिनय करायचा आहे, हे कळले तेव्हा त्यांनी त्यांना त्यांच्या 'फॅशनेबल इंडिया' चित्रपटात एक भूमिका दिली.

यानंतर जीवन यांना एकापाठोपाठ अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले. जीवन यांनी विविध भाषांमधील सुमारे 60 चित्रपटांमध्ये नारद मुनींची भूमिका साकारली. 50च्या दशकात बनलेल्या प्रत्येक धार्मिक चित्रपटात त्यांनी नारदांची भूमिका केली होती. 1935 मध्ये 'रोमँटिक इंडिया' चित्रपटात अभिनय केल्यावर जीवन यांना खरी ओळख मिळाली.

त्यानंतर त्यांनी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. जीवन यांच्या अविस्मरणीय चित्रपटांपैकी 'अफसाना', 'स्टेशन मास्टर', 'अमर अकबर अँथनी' आणि 'धर्म-वीर', ‘नागिन, ‘शबनम’, ‘हीर-रांझा’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘कानून’, ‘सुरक्षा’, ‘लावरिस’, इत्यादी चित्रपट आहेत. जीवन यांना आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच माहित होते की, आपला चेहरा हीरोसाठी योग्य नाही. म्हणून त्याने खलनायक म्हणून नशीब आजमावले आणि ते यशस्वी झाले. जीवन हे नाव त्यांना विजय भट्ट यांनी दिले होते.