मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. मुख्यमंत्री यांनी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. गोसेखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनास संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. गोसेखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचनक्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर एवढी आहे. या प्रकल्पात एकूण जलसाठा 1146.075 दशलक्ष घनमीटर एवढा राहणार आहे.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे. निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरु करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
या बैठकीत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी या जाणून घेतली.
विकासाची कामे करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. नाग नदीमुळे प्रदूषण होणार नाही यादृष्टीने नाग नदी प्रदूषणासंदर्भात दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम विभागीय आयुक्त संजीवकुमार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता अंकूर देसाई तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.