
मार्च महिना सुरू होताच उन्हाचा चटका वाढू लागला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवू लागतो. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी बाजारात शीतपेयांची मागणी वाढते.

पण आरोग्य तज्ज्ञ नेहमी नैसर्गिक पर्यायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देतात. यामध्ये प्रामुख्याने नारळ पाणी आणि ताक हे दोन लोकप्रिय पर्याय समोर येतात. मात्र, तुमच्या शरीरासाठी काय अधिक फायदेशीर आहे, याबद्दल जाणून घेऊया.

नारळ पाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडिअमचे प्रमाण अधिक असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात.

जे लोक उन्हात जास्त फिरतात किंवा व्यायाम करतात, त्यांच्यासाठी नारळ पाणी इन्स्टंट एनर्जी देणारे पेय आहे. हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

भारतीय आहारशास्त्रात ताकाला पृथ्वीवरील अमृत मानले जाते. ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेला बळकट करतात. ज्यांना उन्हाळ्यात ॲसिडिटी, पोट फुगणे किंवा पचनाच्या समस्या जाणवतात, त्यांच्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे.

ताक प्यायल्याने शरीराचे तापमान लगेच कमी होते आणि जेवण पचण्यास मदत होते. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 देखील मुबलक प्रमाणात असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दोन्ही पेये आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. जर तुम्हाला तातडीने ऊर्जा आणि हायड्रेशन हवे असेल, तर नारळ पाणी निवडा.

पण जर तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर शरीराला थंडावा द्यायचा असेल आणि पचन सुधारायचे असेल, तर ताक घेणे जास्त हिताचे ठरते. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी आणि दुपारी जेवणानंतर ताक घेणे हा एक संतुलित मार्ग असू शकतो.