GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
मुंबईतील प्रत्येक रेल्वेस्थानकाचा इतिहास वेगळा आहे. या प्रत्येक स्थानकाची स्वत:ची अशी स्वतंत्र कहाणी आहे. आज एका अशाच स्थानकाची कहाणी आपण पाहाणार आहे.

देशातलीच काय तर आशियातील पहिली प्रवासी ट्रेन मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे अशी शनिवार दि. १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली होती. मुंबई ते ठाणे अशी ट्रेन पहिल्या दिवशी धावली त्या क्षणाची क्षणचित्रे प्रबोधनकार ठाकरे यांनी एका पुस्तकात लिहिली आहेत.

मुंबईचे बोरीबंदर स्थानक हे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून थोडे दूर अंतरावर होते. १८५३ साली कोळशाच्या तीन इंजिनांच्या सहाय्याने १४ डब्यांची ही ट्रेन ठाण्याला निघाली तेव्हा भायखळा येथे इंजिनात पाणी भरण्यासाठी हॉल्ट घेतला होता.

करीरोड स्थानकाचा इतिहास वेगळा आहे. मुळात हे स्थानक येथील भायखळा येथील रेसकोर्सच्या घोड्यांची पुणे येथील रेसकोर्समध्ये वाहतूक करण्याच्या उद्देश्याने बांधले होते.

'करी' म्हणजे कोणत्या रेसिपीचे नाव नसून त्याचे इंग्रजी स्पेलिंग currey असे आहे. मुंबई आणि बडोदरा दरम्यान रेल्वेचे काम करण्यासाठी बॉम्बे, बडोदा अॅड सेन्ट्रल इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. त्याचे प्रतिनिधी असलेले ब्रिटीश अधिकारी सी.करी यांचे नाव करी रोड स्थानकाला देण्यात आले.

भायखळा - महालक्ष्मी रेसकोर्सवरून घोड्यांना पुण्याच्या रेसकोर्सवर नेण्यासाठी करी रोड स्थानकाचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात करण्यात आले. आता करी रोड स्थानकाचे नाव आता 'लालबाग' करण्याचा प्रस्ताव विधीमंडळाने केंद्राकडे पाठवला आहे.