
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळची जनता खास करुन नेपाळची तरुण पिढी रस्त्यावर उतरली. त्यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात नारे देत नेत्यांना सळो की पळो करुन सोडले. यामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सुशीला कार्की यांना अंतिरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली. परंतू तुम्हाला हे माहिती आहे का सुशीला कार्की आणि इतर नेपाळी नेते भारतातील टॉप युनिव्हर्सिटीतून शिकलेले आहेत.

पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की या महिला नेपाळचे नेतृत्व करणार आहेत. त्यांना ७३ वर्षांच्या असून नेपाळच्या पहिल्या महिला सर न्यायाधीश राहिल्या आहेत. सुशीला यांनी १९७५ मध्ये बनारस हिंदु युनिव्हर्सिटीतून ( BHU) पॉलिटीकल सायन्समध्ये मास्टर्स केले असून त्या क्लासमध्ये टॉपर राहिल्या आहेत. त्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील दिवसांची आठवण काढत असतात. त्यांनी बिराटनगर येथून १९७९ मध्ये वकीली सुरु केली, नंतर २००९ मध्ये त्या सुप्रीम कोर्टाच्या जज झाल्या. त्यांचे शिक्षण आणि नेतृत्व हे बनारस हिंदु युनिव्हर्सिटीने घडवले आहे.

बाबुराम भट्टराय हे २०११ ते २०१३ पर्यंत नेपाळचे ३६ वे पंतप्रधान होते. १९५४ मध्ये जन्मलेल्या बाबुराम यांचे शालेय शिक्षण नेपाळमधील गोरखा येथे झाले. त्यांनी १९७७ मध्ये चंदीगड येथून आर्किटेक्चरची पदवी घेतली आणि त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमधून एमटेक केले. त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) पीएचडी पूर्ण केली.ते नेपाळमधील माओवादी चळवळीचे एक मोठे नेते बनले.

गिरीजा प्रसाद कोईराला यांना नेपाळमध्ये प्रेमाने गिरीजा बाबू म्हटले जात होते. ते नेपाळचे लोकप्रिय पंतप्रधान होते. १९२४ मध्ये जन्मलेल्या कोईराला यांनी १९९१-१९९४,१९९८-१९९९, २०००-२००१ आणि २००६-२००८ असे चार वेळा ते नेपाळचे पंतप्रधान झाले. त्यांचे शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीच्या किरोडी मल कॉलेजात झाले. DU मधून ग्रॅज्युएट झालेल्या गिरीजा बाबू यांनी नेपाळची लोकशाही मजबूत केली. त्यांचा कॉन्फिडन्स आणि लीडरशिप DU ची देणगी मानली जाते.

तुलसी गिरी हे १९७५ - १९७७ या काळात नेपाळचे पंतप्रधान होते. १९२४ मध्ये जन्मलेल्या गिरी यांनी त्यांचे उच्च शिक्षण भारतात पूर्ण केले. प.बंगाल येथील सुरी विद्यासागर कॉलेजात शिकले.हे कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता याच्याशी संलग्न आहे. १९४२ साली स्थापण झालेल्या या कॉलेजातून ते समाजकार्यात ओढले गेले आणि नेते बनले. त्यांनी नेपाळमध्ये पंचायत योजना लागू करण्यात महत्वाचे कार्य केले.

बी.पी. ( विश्वेश्वर प्रसाद ) कोईराला यांना आधुनिक नेपाळचे जनक म्हटले जाते. त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोलकाता युनिव्हर्सिटीतून लॉची डीग्री घेतली. तेथून त्यांचा राजकीय आणि साहित्यिक प्रवास सुरु झाला. ते १९५९ मध्ये नेपाळचे पंतप्रधान बनले.

डाव्या चळवळीचे नेते मनमोहन अधिकारी यांनी वाराणसी येथूनच बीएससी झाले आणि त्याचवेळी ते भारताच्या स्वातंत्र्य आणि विद्यार्थी चळवळींशी देखील जोडले गेले. नंतर ते नेपाळच्या महत्त्वाच्या कम्युनिस्ट नेत्यांपैकी एक बनले आणि पंतप्रधानही झाले.

कृष्णप्रसाद भट्टराई यांनी देखील बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) शिक्षण घेतले. त्यांनी BHU मधून पदवी प्राप्त केली होती. ते नंतर नेपाळचे पंतप्रधानही झाले.