
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात जानमपल्ली येथे आज सकाळी विहीर खोदण्याचे काम करत असताना अचानक ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत दोन शेतकरी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि गावकऱ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

जानमपल्ली येथील 'धन्नाडा समाक्का' यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. शेतकऱ्यांनी शेतीच्या उपयोगासाठी सुमारे ५० फूट खोल विहीर खोदली होती.

खालच्या भागातील माती कोसळल्याने जवळपास दहा फुटांची वाळू आणि माती खाली काम करणाऱ्या दोन मजुरांवर पडली. उप्पाला रवी आणि कोंडा समय्या (कोंडा सोमय्या) अशी या दोन मजुरांची नावे आहेत.

आज सकाळी सुमारे साडेदहा वाजता ही घटना घडली. ढिगारा कोसळल्याची माहिती मिळताच गावातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी आपल्या परीने माती आणि वाळू काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

त्यानंतर पोलीस प्रशासनालाही घटनेची माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.

सध्या घटनास्थळी ४२ अंश सेल्सियस तापमान आहे. गावातील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी माती आणि वाळू बाजूला करण्याचे काम करत आहेत.

या घटनेनंतर सुमारे आठ तास उलटून गेले असले तरी अद्याप या दोन्ही शेतकऱ्यांचा शोध लागलेला नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.