थेट मंत्र्यांनीच सुचवली मालिका, 17 महिने TRPवर केले राज्य, प्रत्येक पात्र बनले होते प्रेक्षकांचे आवडते
एक अशी मालिका होती जिचे 156 भाग प्रदर्शित झाले होते. या मालिकेने जवळपास 17 महिने TRP यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला होता. आता ही मालिका कोणती? जाणून घ्या...

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ सारख्या मालिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली, पण त्यापूर्वीही एक असा शो होता ज्याने भारतीय प्रेक्षकांना टीव्ही सीरियल पाहण्याची नवी सवय लावली. या शोच्या वेळी लोक आपले काम थांबवून पूर्ण कुटुंबासह टीव्हीसमोर बसत आणि गल्ली बोळामध्ये भयाण शांतता पसरायची. त्या काळात प्रत्येक घरात टीव्ही नव्हता, पण ज्या घरात टीव्ही होता, तिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून या एका सीरियलची वाट पाहत असे. या शोची कहाणी सामान्य लोकांच्या जीवनाशी खूप जवळची होती, म्हणून लोक त्यातील पात्रांना आपल्या कुटुंबाचा भाग समजू लागले होते.

आज आम्ही ज्या शोबद्दल बोलत आहोत, तो दुसरा तिसरा कोणता नसून ‘हम लोग’ (Hum Log) हा आहे. हा शो ७ जुलै १९८४ रोजी दूरदर्शनवर पहिल्यांदा प्रसारित झाला होता. भारतीय टीव्ही इतिहासातील हा पहिला डेली सोप ओपेरा आणि पहिली मालिका मानली जाते. या शोचे लेखन प्रसिद्ध लेखक मनोहर श्याम जोशी यांनी केले होते, तर दिग्दर्शन पी. कुमार वासुदेव यांनी केले होते. ‘हम लोग’ने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही तर समाजातील अनेक गंभीर मुद्द्यांना आपल्या एपिसोडमध्ये स्थान दिले.

‘हम लोग’ने सुमारे १७ महिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या शोचे एकूण १५६ एपिसोड प्रसारित झाले आणि शेवटचा एपिसोड १७ डिसेंबर १९८५ रोजी प्रसारित झाला. शोची कहाणी १९८० च्या दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरत होती. यात कुटुंबातील आर्थिक अडचणी, मुलांच्या स्वप्नांची, नात्यांच्या गुंतागुंती आणि समाजातील विविध समस्या दाखवल्या होत्या.

या शोतील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. विनोद नागपाल, जयश्री अरोडा, राजेश पुरी, अभिनव चतुर्वेदी, सीमा भार्गव, दिव्या सेठ, सुषमा सेठ आणि लवलीना मिश्रा सारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सामान्य कुटुंबांच्या कहाणीला पडद्यावर जिवंत केले. या शोची लोकप्रियता इतकी वाढली होती की, लोक या पात्रांच्या सुख-दुःखाशी स्वतःला जोडून घेऊ लागले होते.

‘हम लोग’ हा शो एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट (एजुटेनमेंट) या संकल्पनेवर आधारित होता. हा शो मेक्सिकन टीव्ही मालिका ‘वेन कॉनमिगो’वरून प्रेरित होता. याची कल्पना तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री वसंत साठे यांनी दिली होती. १९८२ मध्ये मेक्सिकोच्या दौऱ्यावेळी त्यांना ही कल्पना सुचली. ‘हम लोग’ या मालिकेच्या यशाने पुढील अनेक भारतीय टीव्ही शोंसाठी रस्ता मोकळा केला आणि आजही हा शो दूरदर्शनवरील सर्वात स्मरणीय मालिकांपैकी एक मानला जातो.