
इंडिया आघाडीची काल दिल्लीत बैठक झाली. राहुल गांधी यांनी या निमित्ताने डिनरच आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी वोट चोरीवर प्रेझेंटेशन दिलं. त्यावेळचा उद्धव ठाकरेंचा एक फोटो व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे सहाव्या रांगेत बसले होते. त्यावरुन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आज टीकेची राळ उठवली आहे.

उद्धव ठाकरेंची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरसारखी झालीय असं विरोधक म्हणतायत. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "त्यांना म्हणावं नुसता पिंजराच नाही, तर तुम्ही बूट चाटेगिरी करताय ते बघा आधी" उद्धव ठाकरे गट-मनसे युती होणार का? यावर त्या म्हणाल्या की, आमची युती होईलना घाई कसलीय?

'साहेब यांना माफ करा, सडका मेंदू साफ करा' अशा घोषणा देत आज दादर शिवाजी पार्क येथील दिवंगत हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी आंदोलन केलं. उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवलं, त्यासाठी हे आंदोलन झालं.

"जेव्हापासून मविआची स्थापना झालीय, तेव्हापासून उबाठा पक्षाचं हेडक्वार्टर दिल्लीत झालय. त्यांचे नेते सोनिया गांधी. राहुल गांधी आहेत, हे सगळ्या जगाला कळलय. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ते दिल्लीत गेले होते, ज्या उद्धव ठाकरेंना शिवसेना-भाजप युतीमध्ये इतका मानसन्मान होता. त्यांच्या आदेशाने चालायचं. त्यांची खुर्ची मध्यस्थानी असायची. त्यांना दिल्लीत जाऊन पाचव्या-सहाव्या रांगेत बसावं लागतय. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यावर काय अवस्था झालीय" अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली.

"उद्धव ठाकरे म्हणतात, ठाकरे ब्रांड आहे, कुठे आहे तो ब्रांड?. दिल्लीत जाऊन वाकला नाहीत, झुकला नाहीत, तर सरपटलात. सहाव्या रांगेत बसवलं. पुढच्यावेळी ती रांग सुद्धा मिळणार नाही. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात?. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व शिकवलं. कुठे आहे तुमचा स्वाभिमान?. सगळी उबाठा सोनिया गांधींच्या पायावर टाकलीत. आतापर्यंत सोनिया गांधी, राहुल गांधी कितीवेळा या स्मृती स्थळावर आले?" अशी टीका शितल म्हात्रे यांनी केली.