डोळ्यात आनंदाश्रू अन् थरथरते हात… हक्काच्या घराची चावी घेताना ऊर आला भरून, बीडीडीच्या रहिवाशांना मिळाले अखेर हक्काचे घर
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

मुंबई नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरण झाले. या वितरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ पुनर्वसन इमारतींतील एकूण ८६४ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये ४२३ सदनिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिस विभागातील निवृत्त पोलिस, त्यांचे वारस व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांकरिता आहेत.
हक्काच्या घराची चावी घेताना ऊर आला भरून
घराची चावी घेताना नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ही चावी हातात घेताना त्यांचे हात थरथर कापत होते. काही नागरिकांचा हक्काच्या घराची चावी घेताना ऊर भरुन आला आहे. आजचा दिवस बीडीडी चाळीच्या नागरिकांसाठी आनंदाचा आहे. नागरिकांना चावी वाटप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा राज्यामध्ये गेली 40 वर्षे गाजणारा मुंबईतला एक विषय होता. ज्यावेळी मी मुख्यमंत्री म्हणून 2014च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतले महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरु केला त्यावेळी बीडीडीच्या पुनर्विकाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत. तर खूप जुन्या बिल्डींग आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. आणि प्रत्येक वेळी कोणी तरी नवा बिल्डर त्या ठिकाणी प्रपोजल तयार करतो. मग ते जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलवर चर्चा होते, मंथन होतं, चिंतन होतं. ते चिंतन होईपर्यंत दुसरा कोणी तरी बिल्डर येतो. तो जुनं कसं चुकीचं आहे, नवीन माझं कसं चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्धे लोक याच्या बाजूने अर्धे लोक त्याच्या बाजूने असं करता करता ते स्वप्न 30-35 वर्षे पुनरविकासाचं पूर्ण होत नव्हतं. म्हणून मग मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे काम करायचं झालं तर हे फार कठिण आहे. लोकांना त्या ठिकाणी ट्रांझिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवरचा विश्वास. त्यामुळे जोपर्यंत शासन स्वत: हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तो पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही. म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलवून सांगितलं आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल. आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वत: त्या ठिकाणी काम करेल. तो निर्णय आपण केला.”
पुढे ते म्हणाले, “अनेकांनी त्याला विरोध केला. काही हित संबंध असलेले लोकं होते त्यांनी लोकांना त्याच्या विरुद्ध पेटवून देण्याचा प्रयत्न देखील केला. पण मला असे वाटते की बीडीडी चाळीच्या नागरिकांनी शासनावर विश्वास ठेवला. त्यानंतर प्रकल्पाची सुंदर अशी आखणी केली. आखणी केल्यानंतर म्हाडाला मी दुसरं सांगितलं की हे काम जर आपल्याला कारायचे असेल तर आपल्याला देशातील उत्तर प्रकारच्या बांधकाम कंपन्या आहेत त्यांनाच आपण यामध्ये आणलं पाहिजे. मग L&T सारखी कंपनी, टाटा सारखी कंपनी ज्या देशातील सर्वोत्तम कंपन्या आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण कॉलिफाय करु शकू अशा स्ट्रीक्ट नॉब्ज आपण त्या ठिकाणी टाकेल. त्यातून अतिशय़ उत्तम प्रकराची L&T सारखी कंपनी आज आली. त्या कामाची सुरुवात झाली. नंतर काय काय अडचणी आल्या त्या शिंदे साहेबांनी सांगितल्या. पण आपलं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या अडचणी दूर केल्या. याला अतिशय वेगाने काम केले. मला आनंद आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण वरळीच्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये नायगावच्या आणि आता वर्षातून दोन वेळा तरी चाव्या वाटपाचा कार्यक्रम करु.”
