
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये नव्या अध्यात्मिक आणि भावनिक प्रवासाची सुरुवात होत आहे. हा नवा अध्याय मालिकेच्या कथा-प्रवाहात महत्त्वपूर्ण वळण घेऊन येणार आहे.

जिथे स्वामी समाधीस्थ अवस्थेत असतात. तिथे पारंपरिक आरतीची तयारी सुरू असते आणि अचानक स्वामी आदेश देतात की यावेळी भस्मारती केली जावी. ही अनपेक्षित मागणी वातावरण बदलून टाकते.

लगेच शंखनाद, झांजा आणि रुद्र जपाचा गूंज सुरू होतो. झांजांच्या नादात, धूपाच्या धुरामध्ये, पंचारतीऐवजी भस्माची आरतीची सुरुवात होते. पुढे काय होणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

भस्म उडवतानाचे क्षण दिव्य आणि मंत्रमुग्ध करणारे वाटतात. बाळप्पा स्वामींच्या चरणी धोत्र्याचं फूल अर्पण करतात, जे मालिकेच्या आध्यात्मिक गाभ्याशी सुसंगत आहे.

कारण स्वामींचं असं म्हणणं आहे, "जे इतरांना त्याज्य वाटतं, ते आम्हाला प्रिय असू शकतं." दुसरीकडे, कृष्णा नावाची तरुण मुलगी स्वामींच्या पादुका घट्ट पकडून प्राणपणाने धावताना दिसते.

दमछाक झालेली, घामाने चिंब पण न थांबणारी कृष्णा अचानक पडते. तरी तिचा हात पादुकांवर घट्ट असतो. तिच्या पायात चाळ घुंगरु बांधलेले आहेत. ती स्वामींकडे मला वाचवा असा आर्त धावा करते आहे. नक्की याचा अर्थ काय असणार आहे हा प्रश्न प्रेक्षकांना पडणं साहजिकच आहे.

या सगळ्यात स्वामींची लीला, कृष्णाची स्वामींवर असलेली भक्ती कशी तिला या आव्हानांतून बाहेर काढणार आणि मठाचे दरवाजे भक्तांसाठी बंद असताना स्वामी कशी कृष्णाला मदत करणार याची कथा मालिकेत पहायला मिळणार आहे.