Sunetra Pawar : दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा? सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या दिल्ली दौऱ्यात काय घडणार ?
अजित पवार यांच्या निधनानंतर, उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मंत्री मंडळाच्या बैठकीलाही त्या उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आजच त्या दिल्ली दौऱ्यावरही जाणार असून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. 28 जानेवारी रोजी अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ लँडिंगच्याआधीच त्यांचं विमान कोसळलं आणि स्फोट झाला. यामध्ये अजित पवार यांच्याह 5 जमांनी जीव गमावला. त्यांच्या निधनाने राज्य शोकाकुल झालं, कुटुंबावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. मात्र सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दु:ख हाजूला ठेवत कर्तव्याचं पालन केलं. 31 जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर लोकभवन येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं आज शक्तीप्रदर्शन
अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस होत आले असून आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सुनेत्रा पवार या देवगिरी निवासस्थानी दाखल झाल्या असून जय पवार आणि पार्थ पवार हे देखील देवेगिरी येथे आहेत. आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीच्या पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रालयात आपला पदभार स्वीकारतील.
दरम्यान यावेळेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आणि प्रमुख नेते हे उपस्थितीत राहणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा आज शक्तिप्रदर्शन करणार आहे. हे शक्तिप्रदर्शन करत सर्व आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत असा संदेश दिला जाणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे एकत्रित येणार, त्यांचं विलीनीकरण होणार, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आज सर्व आमदार आणि प्रमुख नेते यानिमित्ताने एकत्रित येऊन अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
सुनेत्रा पवार यांचा आजच दिल्ली दौरा
दरम्यान आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारून, तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यातच आज प्रचंड वेगाने घडामोडी घडताना दिसणार आहेत. कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्या आज दिल्लीत दाखल होणार असून, उद्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, यात भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीत ते पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा होणार आहे.
दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा ?
सुनेत्रा पवार या दिल्लीला जाणार असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत दिल्लीत खलबतं होऊ शकतात. राज्यात पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधानीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वांबरोबर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील कॅबिनेट बैठकीनंतर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणाच्या संदर्भात भाजप पक्षश्रेष्ठींशी काही चर्चा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दिल्लीत नेमकं काय घडतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
