जर ते मुख्यमंत्री बनले असते, तर मला ईर्षा..; रजनीकांत यांच्या वक्तव्यावर कमल हासन यांनी सोडलं मौन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी रजनीकांत यांच्यासोबतच्या स्पर्धेबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. आमच्यात नेहमीच एक निरोगी स्पर्धा राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार कमल हासन आणि रजनीकांत हे नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे आणि स्टारडममुळे चर्चेत असतात. या दोन दिग्गजांनी अनेक दशकांपासून तमिळ सिनेसृष्टीत आपली मजबूत ओळख टिकवून ठेवली आहे. चाहते नेहमीच या दोघांमध्ये तुलना करतात आणि त्यांच्यात तगडी स्पर्धा असल्याचं मानतात.

आता या संपूर्ण मुद्द्यावर कमल हासन यांनी पहिल्यांदा मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की रजनीकांत आणि त्यांच्यात ईर्षा किंवा मत्सर अशी कोणती भावनाच नाही. दोघांच्या नात्यात नेहमीच सन्मान आणि सकारात्मक स्पर्धा राहिली आहे.

नुकतंच रजनीकांत यांनी मस्करीत म्हटलं होतं की, अभिनेते विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनल्याचा त्यांना आनंदच आहे, पण जर कमल हासन मुख्यमंत्री बनले असते, तर कदाचित त्यांना ईर्षा वाटली असती. रजनीकांत यांचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं आणि त्यावर आता कमल हासन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कमल हासन म्हणाले की, ते फक्त मस्करी करत होती. आम्हाला कधीच एकमेकांविषयी ईर्षा वाटली नाही. आम्ही दोघं नेहमीच आपापल्या कामावर लक्ष केंद्रीत करून होतो. आमच्या मनात एकमेकांविषयी खूप आदर आहे. यावेळी कमल हासन असंही म्हणाले की, चित्रपटांमध्ये माझ्यात आणि रजनीकांत यांच्यात सकारात्मक स्पर्धा नक्कीच आहे. माझ्या मते प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा गरजेची असते, कारण त्यामुळेच आपण आणखी उत्तम काम करण्यासाठी प्रेरित होतो.

जरी स्पर्धा असली तरी समोरच्या व्यक्तीशी शत्रुत्व किंवा त्यांच्याविषयी ईर्ष्येची भावना मनात अजिबात नाही, असं कमल हासन यांनी स्पष्ट केलं. यादरम्यान कमल हासन यांनी तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतली. तर विधानसभा निवडणूक निकालानंतर रजनीकांत यांनी माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतल्यावरून वाद झाला होता.