
सण-उत्सव म्हटलं की गोड-धोड, मिठाई हे आवर्जून आलंच. दिवाळीत घरी मिठाईचे अनेक प्रकार बनवले जातात आणि पाहुण्यांकडून मिठाई दिली जाते. गोड खाऊन कंटाळा आल्यानंतर अनेक दिवस हे मिठाईचे डबे फ्रीजमध्ये तसेच पडून राहतात.

परंतु प्रत्येक मिठाईचीसुद्धा एक्स्पायरी डेट (Expiry Date) असते. कोणती मिठाई किती दिवस खाण्यालायक असते, हे तुम्हाला माहीत आहे का? साखर, दूध, तूप, मैदा, ड्रायफ्रूट्स, स्टार्ज आणि वेगवेगळ्या धान्यांपासून विविध प्रकारचे मिठाई बनवले जातात.

फार काळ मिठाई टिकून राहावी म्हणून काहींमध्ये प्रिझर्वेटिव्ह, अॅडिटिव्ह, कृत्रिम रंग, चव वाढवणारे इसेन्स वापरले जातात. याचसोबत स्वच्छता आणि भेसळ यांचीही भीती असते. त्यामुळे मिठाई घेताना या सर्व गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

कलाकंदसारखी मिठाई एकच दिवस टिकू शकते. त्यामुळे ज्यादिवशी ती बनवली जाते, त्याच दिवशी ती खावी. दूध किंवा दूग्धजन्य पदार्थांपासून बनवलेली मिठाई, उदा. रसगुल्ला, रसमलाई, चमचम, संदेश आणि मलाई रोल.. हे दोन दिवसांपर्यंत खाऊ शकता. ते तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता.

लाडूचे प्रकार आणि खव्यापासून बनवलेली मिठाई चार दिवसांपर्यंत खाण्यालायक असते. मिल्ककेक, पेढा, बर्फी, मोतीचूरचे लाडू, नारळाचे लाडू, मोतीपाक यांचा त्यात समावेश असतो.

काही मिठाई सात दिवसांपर्यंत फ्रेश राहू शकतात. तूप आणि ड्रायफ्रूट्सचा वापर करून बनवलेली मिठाई अधिक दिवस टिकू शकते. या यादीत घेवर, काजूकतली यांचा समावेश आहे.