
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. भारतात तर इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. आता तर थेट भारतात मद्यनिर्मितीवर परिणाम पडत असल्याचे समोर आले आहे. जगभरातील पुरवठा साखळी बिघडल्याने आता भविष्यात मद्य महागणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भारतात अनेक परदेशी कंपन्या मद्यनिर्मिती उद्योगात सक्रीय आहेत. परंतु युद्धामुळे जगभरातून कच्चा माल भारतात येण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळेही मद्य निर्मिती उद्योग क्षेत्राला फटका बसत आहे.

इराणने कतारवर केलेल्या हल्ल्यांमुळे भारतील गॅस पुरवठ्यावर परिणाम पडला आहे. भारत जगातील चौथा सर्वात मोठा गॅस आयातदार देश आहे. भारत कतारकडून साधारण 40 टक्के गॅसची आयात करतो. त्यामुळे गॅसची कमतरता भासत असल्याने मद्य साठवण्यासाठी लागणाऱ्या काचेच्या बॉटलची निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत.

काचेच्या बॉटल्सचा तुटवडा निर्माण झाल्याने आता मद्यनिर्मितीत अडचणी येत आहेत. काचेच्या बॉटल्सची किंमत साधारण 20 टक्के वाढली आहे. फक्त बॉटलच नव्हे तर पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या इतरही गोष्टी महागल्या आहेत. मद्य ठेवण्यासाठी वापरले जाणाऱ्या कार्टनची किंमतही दोन पटीने वाढली आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेता भविष्यात मद्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाले तर युद्धाचा मद्यप्रेमींना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.