
महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांत बिबट्याची दहशत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर, पुणे, बदलापूरसह रायगडपर्यंत बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले असून नागपूर आणि रायगडमध्ये नागरिकांना जखमी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.

नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागात बिबट्या दिसला होता, मात्र तो सापडला नव्हता. आज पहाटेच्या सुमारास याच बिबट्याने चार ते पाच लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. अखेर वनविभागाने या बिबट्याला जेरबंद केले आहे.

पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हालचाली तीव्र असताना, मंचर आंबेगाव वनपरिसरात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. वाघाळे मळा परिसरातील एका घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात रात्री उशिरा दोन महिने वयाचे दोन बिबट्याचे बछडे सापडले. याच भागात दुसऱ्या बिबट्याची माहिती मिळताच, वन विभागाने दोन बिबट्यांसह दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे. या बछड्यांना उपचारासाठी अवसरी वनउद्यानात हलवण्यात आले आहे.

पुण्यातील वाघोली-अष्टापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ कायम आहे. काल एका महिलेला जखमी केल्याची घटना ताजी असतानाच, रात्रीच्या सुमारास रेणुका पार्क, उबाळे नगर आणि मेपल हॉटेल शेजारील लोकवस्तीत कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या आल्याचे पाहायला मिळाले. यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी त्वरीत बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात तब्बल ६० हून अधिक बिबटे वावरत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चाकण वनक्षेत्रात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, याच भागात बिबट्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

बदलापूर जवळील आंबेशीव गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याने दोन बकऱ्यांची शिकार केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. वनविभागाची टीम आंबेशीव गावात दाखल झाली असून, बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील आव्हाने खुर्द येथे भगवान पठाडे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ दबा धरून बसलेला बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. माणसांची चाहूल लागताच त्याने पळ काढला, तरीही परिसरात घबराटीचे वातावरण असून, पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्या अद्याप सापडला नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणखी वाढले आहे.

दरम्यान या प्रकरणी वन विभागाचे नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे. एकट्याने घराबाहेर पडणे टाळावे. तसेच बिबट्याच्या कोणत्याही हालचाली दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.