
पैठण येथे होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी गोदावरी नदीपात्रातून पाणी सोडण्याचे व पात्र रिकामे करण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी जायकवाडी धरणातून नदीपात्रातील पाणी कमी केले जात आहे.

यामुळे भाविकांना नाथांच्या पालखीचे सुलभ दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी हे काम वेगाने सुरू आहे. मात्र गोदावरी पात्रातील पाणी कमी होताच नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. अनेक नागरिक गोदावरी पात्रात उतरले ते गंगार्पण केलेली नाणी आणि सोन्या-चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी. एवढंच नव्हे तर दशक्रिया घाट परिसरात महिला, पुरुषांसह अगदी लहान मुलंही नदीपात्रात उतरून वस्तू धुंडाळताना दिसली.

नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. पाणी ओसरल्यामुळे नदीचे विस्तीर्ण पात्र उघडे पडले असून, या गाळामध्ये सोने शोधण्यासाठी शेकडो नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. हातात चाळण्या, टोपल्या आणि आशेने भरलेल्या नजरा घेऊन आबालवृद्ध नदीपात्रात नशीब आजमावताना दिसत आहेत.

नाथ मंदिर पैठण परिसराच्या मागील दशक्रिया घाटावर वर्षभर मोठ्या प्रमाणात अंत्यविधी होतात. स्थानिक श्रद्धेनुसार, विधी दरम्यान अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा दागिने अस्थींसोबत नदीत विसर्जित केले जातात.

पाणी कमी झाल्याने हा गाळ उघडा पडला असून त्यामध्ये सोनं सापडलं का? याच शोधासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदीत उतरल्याचे चित्र सध्या पैठणमध्ये पाहायला मिळत आहे. त्यात मोठ्यंसह लहान मुलांनाही कामाला लावल्याचं दिसलं.