
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा बाप ठरला आहे. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने भारतात कमाईचा 500 कोटींचा आणि जगभरात 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. परंतु एक कुटुंब या चित्रपटावर खूप नाराज आहे.

युकेमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी कुटुंबाने रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. या कुटुंबाने आदित्य धरच्या या चित्रपटाला 'फालतू' असं म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी व्हिडीओत मेजर इक्बाल जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच कुटुंबाने 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचं कौतुक केलं होतं. परंतु आता 'धुरंधर 2'वर ते टीका करत आहेत. हा फक्त ठराविक लोकांना खुश करणारा चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलंय.

या व्हिडीओमध्ये एकानंतर एक व्यक्ती समोर येते आणि म्हणते, "थर्ड क्लास, मी माझ्या आयुष्यात इतका घाणेरडा चित्रपट पाहिला नव्हता. तुम्हाला माहीत आहे ना, मेजर इक्बालने काय म्हटलं होतं? आम्ही पुन्हा येणार, पुन्हा घुसणार आणि पुन्हा मारणार. घाणेरडा आणि थर्ड क्लासपेक्षाही अजून कोणता वाईट शब्द असेल तर तो या चित्रपटासाठी आहे."

"हा चित्रपट फक्त भारतीय मीडियाला खुश करण्यासाठी बनवला आहे. याआधीही पाकिस्तानविरोधी चित्रपट बनले आहेत. परंतु याच्या इतका वाईट कोणताच नव्हता. मी आताच एका पाकिस्तानी दिग्दर्शकाशी बोललो, त्यांनी सांगितलं की चित्रपटात जे दाखवलं तसं काहीच सत्य नाही", असं दुसरी व्यक्ती सांगते.

यानंतर व्हिडीओमध्ये संपूर्ण कुटुंबीय मिळून 'मेजर इक्बाल जिंदाबाद'च्या घोषणा देऊ लागतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'सत्य कटूच असतं', असं एकाने म्हटलंय. तर 'पाकिस्तानविरोधी आहे हे माहीत असतानाही कशाला बघितलं', असा सवाल दुसऱ्याने केला.