
भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचे मतचोरीचे आरोप फेटाळून लावले. विशेष म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना इशाराच देऊन टाकला आहे. पुढच्या सात दिवसांत शपथपत्र द्या अन्यथा माफी मागा असं म्हणत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींना सुनावलं आहे.

निवडणुकीसंदर्भात करण्यात आलेल्या आरोपांबाबत सात दिवासांच्या आत शपथपत्र आल्यास राहुल गांधी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असे सिद्ध होईल. फक्त एक पीपीटी दाखवून चालणार नाही, असे ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे.

दाखवण्यात आलेल्या पीपीटीत निवडणूक आयोगाचे आकडे नाहीत. चुकीचे आकडे दाखवून पोलिंग ऑफिसरनेच एका महिलेने दोन वेळा मतदान केल्याचे सांगितल्याचा दावा करणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर विषयांत शपथपत्राशिवाय निवडणूक आयोग काम करणार नाही, असं निवडणूक आयुक्तांनी ठणकावून सांगितलं.

तसेच निवडणूक आयोगाच्या डोक्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच निवडणूक न घाबरता मतदारांच्या पाठीशी आहे, असेही यावेळी ज्ञानेश कुमार यांनी बोलून दाखवले.

दरम्यान, आता एक तर केलेल्या आरोपांबाबत शपथपत्र द्या किंवा देशाची माफी मागा, या निवडणूक आयुक्तांच्या आव्हानाला राहुल गांधी नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.