
दरवर्षी देशात कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि किफायतशीर मानला जातो. म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे. रेल्वे विभाग वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करतो.

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे विभागाकडून हे नियम बदलले जातात. भारतीय रेल्वे विभागाने आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. अनेकदा रेल्वेने एकाच पीएनआर नंबरवर अनेकजण प्रवास करतात. यामध्ये कधी मित्र-मैत्रीण असतात, तर कधी सर्व कुटुंब एकाच पीएनआरवर प्रवास करत असतं.

एकत्रपणे प्रवास करणाऱ्या अशा लोकांना त्रास होऊ नये म्हणून हा नियम बदलण्यात आला आहे. आता ग्रुपने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रत्येकाला ओळखपत्र विचारले जाणार नाही. या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीचे जरी ओळखपत्र तपासले तरीदेखील आता सर्वांची ओळख पटलेली आहे, असे गृहित धरले जाईल.

आता प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासले जाणार नाही. एकाच पीएनआरवर प्रवास करणाऱ्यांपैकी एखाद्या व्यक्तीकडे वैध आधार कार्ड पॅन कार्ड, मतदान कार्ड आदी ओळखपत्र असेल तर अन्य प्रवाशांना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार नाही.

या नियमबदलामुळे तिकीट तपासणीची प्रक्रिया सोपी होणार आहे. टीसीचा वेळही वाचेल आणि प्रवाशांना होणार त्रासही कमी होईल, असे रेल्वे विभागचे मत आहे. दरम्यान, रेल्वेने बदललेल्या या नियमाच सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.