
भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने 58 धावा करताच एका विक्रमाची नोंद होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा पूर्ण होणार आहेत. 27 हजार धावांचा पल्ला झटपट गाठणारा खेळाडू ठरेल.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 623 डावात (226 कसोटी, 396 वनडे आमि 1 टी20) 27 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत काढण्याची संधी विराट कोहलीकडे आहे.

विराट कोहलीने 591 डावात 26942 धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध 27 हजार धावा गाठेल यात शंका नाही. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने 27 हजार धावा करणारा फलंदाज ठरेल. अशी कामगिरी करणारा जगातील चौथा फलंदाज ठरेल.

सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 34357 धावा आहेत. तर श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर 28016 धावा आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर 27483 धावा असून तिसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीने पुढच्या 8 डावात जर 58 धावा केल्या तर 600 पेक्षा कमी डावात 27 हजार धावा करणारा 147 वर्षातील पहिला फलंदाज ठरेल. त्यामुळे विराट कोहलीकडून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खूप साऱ्या अपेक्षा आहेत.