
टीम इंडियाने सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी धुव्वा उडवला. यासह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम आरपी सिंगच्या नावावर होता.

अर्शदीपने आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी सहा सामन्यात विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या गोलंदाजीची धार दिसून आली. अर्शदीप सिंगने या सामन्यात 4 षटकं टाकत 37 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले.

अर्शदीप सिंगने या टी20 वर्ल्डकपमध्ये 15 गडी बाद केले आहेत. यासह भारताकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. आरपी सिंगने 2007 मध्ये 12 विकेट्स घेतल्या होत्या.

अर्शदीप सिंग 2024 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अफगाणिस्तानचा फजलहक फारुकी आहे. त्याने 16 गडी बाद केले आहेत.

टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा सामना आात इंग्लंडशी होणार आहे. 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता ही लढत होईल. या सामन्यात टीम इंडियाला 2022 वर्ल्डकपचा वचपा काढण्याची संधी आहे.