
आयपीएलच्या स्पर्धतला अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. जवळपास सर्वच संघांनी आपले 7 सामने खेळले आहेत. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ अव्वल स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ तळाळी आहे. असं असताना पाच संघांच्या कर्णधारांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.

पाच संघांच्या कर्णधारांनी स्लो ओव्हर रेट नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरला आहे.आता पुन्हा अशी चूक केल्यास या कर्णधारांवर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल.

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात हार्दिक पांड्याचा नेतृत्वात संघ वेळेवर षटके पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर कारवाई करण्यात आली आहे.बीसीसीआयने हार्दिक पांड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आता मुंबई इंडियन्सने सलग दोन सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटचा नियम मोडला तर हार्दिकवर एका सामन्याची बंदी घातली जाईल.

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सने स्लो ओव्हर रेटचा नियम मोडला आहे. त्यामुळे बीसीसीआयने दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंत आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल यांना दंड ठोठावला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने यापूर्वी दोनदा या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार ऋषभ पंतने दोनदा दंड भरला आहे. आता तिसऱ्यांदा अशी चूक केली तर दंड आणि एका सामन्याची बंदी घातली जाईल.