
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलच्या 17 व्या मोसमातील दोन्ही सामने गमावले. गुजरात विरुद्धचा सामना मुंबईच्या हातात होता. मात्र ऐन क्षणी हार्दिक बॅटिंगने अपयशी ठरला आणि गुजरातने 6 धावांनी सामना जिंकला.

हार्दिकने या सामन्यात घोडचूक केली. जसप्रीत बुमराह हा मुंबईचा प्रमुख गोलंदाज आहे. बुमराह सुरुवातीला विकेट्स घेण्यात आणि डेथ ओव्हरमध्ये धावांवर रोख लावण्यात माहीर आहे. मात्र हार्दिकने बुमराहला ओव्हर न देता इतरांना दिली. या गोलंदाजांनी पाण्यासारख्या धावा दिल्या, परिणामी मुंबईवर दबाव वाढला.

मुंबईला दुसरा सामना हा 27 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झाला. हार्दिक या सामन्यात कर्णधार म्हणून अपयशी ठरला. हार्दिकने या सामन्यातही बुमराहला डावललं. परिणामी मुंबईची गोलंदाजी झोडली गेली.

हार्दिकने पावर प्लेमध्ये जसप्रीत बुमराहला फक्त 1 ओव्हरच दिली. तर इतरांना धावा लुटवत मुंबईची डोकेदुखी वाढवली. बुमराहला 11 वी ओव्हर टाकायला दिली. मात्र तोवर उशीर झालेला.

बुमराहचा योग्य वेळी वापर न करण्याचा परिणाम हैदराबादच्या बॅटिंगनंतर पाहायला मिळाला. हैदराबादने आरसीबीचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक करत विक्रमी 277 धावा केल्या. मुंबईनेही जोरदार प्रतिकार केला, मात्र 31 धावांनी पराभव झाला.

मुंबईच्या सलग 2 पराभवांमुळे कॅप्टन हार्दिक पंड्या याला टीकेचा धनी व्हावं लागलं. नेटकऱ्यांनी हार्दिकला झोडपून काढलं. आता मुंबई आपल्या घरच्या मैदानातील पहिल्या आणि एकूण तिसऱ्या सामन्यात राजस्थान विरुद्ध विजयाचं खातं उघडणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.