
टीम इंडिया आज सुपर-8 राऊंडमधील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्ध आज होणारा सामना जिंकणं क्रमप्राप्त बनलं आहे. त्याशिवाय या सामन्याआधी दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये होणारा सामना सुद्धा टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.

भारत-झिम्बाब्वे सामन्याआधी दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये होणारा सामना का महत्वाचा आहे? ते समजून घेऊया. कारण दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवलं तर नेट रनरेटच महत्व फार राहणार नाही. अशा स्थितीत भारताने आज झिम्बाब्वेला हरवलं तर शेवटचा भारत-वेस्ट इंडिज सामन्यात जिंकणारी टीम थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

पण वेस्ट इंडिजने आज दक्षिण आफ्रिकेला हरवलं आणि भारताने झिम्बाब्बेला हरवलं तर सेमीफायनलच गणित किचकट होईल. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना झिम्बाब्वे आणि भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि भारताने आपला शेवटचे सामने जिंकले, तर पॉइंट्स टेबलमध्ये प्रत्येकी 4-4 पॉइंट होतील अशावेळी रनरेट महत्वाचा ठरेल.

समजा वेस्ट इंडिजने आज दक्षिण आफ्रिकेला हरवलं, तर अशा स्थितीत रनरेट महत्वाचा होईल. मग, अशा स्थितीत IND vs ZIM सामन्यात भारतासाठी पहिली बॅटिंग फायद्याची की बॉलिंग?. टॉस जिंकून पहिली फिल्डिंग फायद्याची आहे. भारताने पहिली गोलंदाजी स्वीकारली तर झिम्बाब्वेला कमी धावसंख्येवर रोखून टार्गेट चेंज करणं थोडं सोपं असेल.

झिम्बाब्वेच्या टीमने 90 धावा केल्या तर भारताला हे टार्गेट फक्त 9 ओव्हरमध्ये गाठावं लागेल. झिम्बाब्वेने 150 धावा केल्या तर टीम इंडियाला 11 ओव्हरमध्ये विजय मिळवावा लागेल. झिम्बाब्वेने 180 ते 200 धावा केल्या तर भारताला 12 ते 15 ओव्हरमध्ये जिंकावं लागेल. तेच पहिली बॅटिंग आली तर धावांचा डोंगर उभारुन पुन्हा कमी धावांवर रोखणं कठीण होईल.