Photo : पपईची काढणी नव्हे तर रोटाव्हेटरने मोडणी, शेतकरी हताश
जालना: निसर्गाशी दोन हात करीत शेतकऱ्यांनी पिकांची जोपासणा केली मात्र, उत्पन्न पदरात पडेपर्यंत काही खरे नाही. याचा प्रत्यय भोकरदण तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथील शेतकऱ्याने उचललेल्या पावलावरुन लक्षात येईल. वर्षभर रात्रीचा दिवस करुन त्यांना पपई बागेची जोपासणा केली. महागडी औषधे आणि होत असलेल्या खर्चाचा विचार न करता पाण्यासारखा पैसाही खर्च केला मात्र, ऐन तोडणीच्या दरम्यान पपईला कवडीमोल दर मिळत आहे. 3 ते 4 रुपयांनी विक्री केल्यावर झालेला खर्चही पदरी पडणार नाही म्हणून शेतकऱ्याने उभ्या पपई पिकामध्ये रोटाव्हेटर घालून त्याची मोडणी केली आहे. वाहतूक आणि काढणीचा जक खर्च निघत नाही तर पीक घेऊनही काय उपयोग म्हणत सुनील देशमुख यांनी मोडणी केली आहे.

3 ते 4 रुपये किलोचा दर : जालना जिल्ह्यामध्ये पपईचे पीक घेतले जाते. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. पण आता तोडणीच्या दरम्यान पपईला 3 ते 4 रुपये किलो असा दर मिळत आहे. दर्जा चांगला असतानाही ही अवस्था आहे. शिवाय दरात घसरण ही सुरुच आहे. व्यापारी कवडीमोल दराने मागणी करीत आहेत.

अडीच एकरातील पपई 'माती': सुनील देशमुख यांनी अडीच एकरामध्ये पपईची लागवड केली होती. पण व्यापाऱ्यांकडून आता कवडीमोल दराने मागणी होत आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला होता. पण निसर्गाचा लहरीपणा आणि आता बाजारपेठेतील दर हे शेतकऱ्यांना हताश करणारे आहेत.

वाहतूकीचा खर्चही निघेणा: उत्पन्न सोडा, झालेला खर्चही सोडा पण तोडणी करुन पपई ही वाहनाद्वारे बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी जेवढा खर्च होणार आहेत तो सुध्दा यामधून निघत नाही. ऊन वाढताच दर वाढतील अशी आशा होती पण उलट घसरण होत आहे.

दुहेरी नुकसान: निसर्गाच्या अवकृपेमुळे पपई बागांवर देखील किड आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला होता. असे असताना महागडी औषध खरेदी करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पण घटत्या दरामुळे सर्वकाही मातीमोल झाले आहे. फळबाग जोपासण्यासाठीचा खर्च आणि आता कवडीमोल दर असे दुहेरी नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे पारंपरिक पिकेच बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे.