
1987-88 च्या सुमारास बोफोर्स घोटाळा प्रकरणामुळे अमिताभ बच्चन यांची प्रतिमा कमी झाली होती. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवले होते आणि त्यांच्या काही चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले होते. अशा कठीण काळात निर्माता केसी बोकाड़िया यांनी अमिताभ यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.

अमिताभ यांचे भाऊ आणि मॅनेजर अजिताभ बच्चन यांनी मोठ्या मानधनाची मागणी केली होती, मात्र बोकाड़िया यांनी त्याहून जास्त रक्कम देण्याची तयारी दाखवली. तरीही अमिताभ यांनी केवळ 70 लाख रुपयांमध्ये चित्रपट साईन केला. ‘आज का अर्जुन’ हा चित्रपट 10 ऑगस्ट 1990 रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर मोठा हिट ठरला.

या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत जया प्रदा प्रमुख भूमिकेत होत्या. अमरीश पुरी, किरण कुमार आणि सुरेश ओबेरॉय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शनही बोकाड़िया यांनीच केले होते. जे त्यांच्या कारकिर्दीतील पहिले दिग्दर्शन होते.

विशेष म्हणजे, अमिताभ यांनी या चित्रपटाची कथा न ऐकताच साइन केला होता. त्यावेळी त्यांच्या सलग 7 चित्रपटांनी अपयश पाहिले होते, त्यामुळे ‘आज का अर्जुन’ हा त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. 1990 च्या दशकातील हा त्यांचा एकमेव मोठा हिट चित्रपट मानला जातो.

चित्रपटातील बप्पी लाहिरी यांचे संगीतही खूप गाजले, विशेषतः ‘गोरी है कलाइयां’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. संकटाच्या काळात आलेला हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या करिअरला पुन्हा उभारी देणारा ठरला.