चार मित्रांची कमाल कहाणी, बजेटपेक्षा 23 पटींनी अधिक कमाई; IMDb वर 8.3 रेटिंग मिळवणारा चित्रपट ओटीटीवर
अवघ्या दहा कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 23 पट अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. जियो हॉटस्टारवर तो स्ट्रीम होणार आहे.

2026 या वर्षात आतापर्यंत एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी काही कमी बजेटचे तर काही बिग बजेटचे चित्रपट होते. अवघ्या दहा कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 23 पट अधिक कमाई करत सर्वांनाच थक्क केलं.

या चित्रपटाचं नाव आहे 'वाझा 2: बायोपिक ऑफ अ बिलियन ब्रदर्स'. मूळ मल्याळम भाषेतील या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 8 मे पासून हा चित्रपट जियो हॉटस्टारवर प्रीमिअर होणार आहे.

'वाझा 2'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. केरळमध्ये सर्वांत कमी वेळात 100 कोटी रुपये कमावणारा हा मल्याळम चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने कल्याणी प्रियदर्शनच्या 'लोका: चाप्टर 1' आणि मोहनलाल यांच्या 'थुडारुम'लाही मागे टाकलंय.

जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, या चित्रपटाने आतापर्यंत 233.63 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दहा कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटासाठी ब्लॉकबस्टर हा शब्दसुद्धा कदाचित छोटा पडेल. स्थानिक भाषेतल्या चित्रपटाने अशा प्रकारचा विक्रम रचणं ही फार मोठी बाब आहे.

'वाझा 2'ला प्रेक्षकांकडून इतकी पसंती मिळाली की आयएमडीबीवर या चित्रपटाला दहापैकी 8.3 रेटिंग मिळाली आहे. यामध्ये हाशिर एच, एलन बिन सिराज, अजिन जॉय आणि विनायक वी. यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत विजय बाबू, अजू वर्गीस, बिजुकुट्टन, अल्फोन्स पुथरेन आणि सुधीश यांच्या सहायक्क भूमिका आहेत.

'वाझा 2'च्या यशात सर्वांत मोठा वाटा हा 'माऊथ पब्लिसिटी'चा आहे. म्हणजेच लोकांकडून या चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची पकड मजबूत होती. विपिन दास यांनी लिहिलेल्या कथेचा या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा आहे. हसीर, अॅलन, अजिन आणि विनायक या चार मित्रांभोवती याची कथा फिरते.

समाज आणि कुटुंबाच्या नजरेत या चौघांना 'लुजर्स' म्हणजेच अपयशी मानलं जातं. जेव्हा त्यांना त्यांच्या या प्रतिमेची जाणीव होते, तेव्हा ते आत्मशोधाच्या प्रवासाला सुरुवात करतात. हा प्रवास भावनिक आणि मनोरंजक असल्याने तरुण पिढीला तो आपलासा वाटतोय.