
जेवणाची चव वाढवणारे मीठ हे आपल्या नेहमीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असते. मीठाचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात कायमच पाहायला मिळतो. फक्त स्वयंपाकघरातच नाही, तर घराच्या स्वच्छतेपासून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो.

पण वास्तुशास्त्रानुसार मिठाशी संबंधित काही खास नियम आहेत, जे तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या घरातील मीठ संपले आहे तर ते खरेदी करण्यासाठी वास्तूशास्त्रात काही विशिष्ट नियम नमूद करण्यात आले आहेत.

जर तुम्हीही कोणताही विचार न करता बाजारातून मीठ खरेदी करत असाल किंवा कोणाला मीठ देत असाल, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच चुकीच्या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरात गरिबी येऊ शकते किंवा श्रीमंत व्यक्ती कंगालदेखील होऊ शकते.

मीठ खरेदी करताना वास्तूचे काही खास नियम लक्षात ठेवावे लागतात. जर तुम्हाला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हवा असेल, तर शुक्रवारी मीठ खरेदी करा. वास्तुशास्त्रानुसार शुक्रवार हा मीठ खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो.

शुक्रवारी मीठ खरेदी केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो. तसेच कधीच धन-धान्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे शुक्रवारी मीठ खरेदी करावे.

पण कधीही शनिवारी मीठ खरेदी करु नका. शनिवारी मीठ खरेदी करणं अशुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी मीठाची खरेदी करणे टाळा.

त्यासोबतच सूर्यास्तानंतर मीठाची खरेदी करू नका. तुम्ही दिवसातून कधीही मीठ खरेदी करु शकता, पण सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी मीठ खरेदी करणे टाळावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.

जर कोणी तुमच्याकडे रात्रीच्या वेळी मीठ मागायला आले, तर त्यांना स्पष्ट नकार द्या. रात्री कोणालाही मीठ देणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा वास करू शकते. तसेच लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते.

त्यामुळे यापुढे मीठ खरेदी करताना किंवा कोणालाही मीठ देताना या वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन नक्की करा. कारण हे मीठ फक्त जेवणाची चवच नाही, तर तुमच्या जीवनाची दिशाही बदलू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)