
फळे आणि भाज्या कापल्यानंतर त्यांचा रंग बदलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी स्वयंपाकघरात काम करताना ती अनेकदा डोकेदुखी ठरते. विशेषतः बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काही वेळातच काळी पडतात. पण यामागचे नेमकं कारण काय, तसेच बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काळी पडू नयेत, यासाठी सोपे घरगुती उपाय आज आपण माहिती करुन घेऊया.

बटाटा आणि सफरचंद काळं पडण्याच्या प्रक्रियेला विज्ञानात एन्झायमॅटिक ब्राउनिंग (Enzymatic Browning) असे म्हणतात. बटाटा आणि सफरचंदामध्ये 'पॉलिफेनॉल ऑक्सिडेज' (Polyphenol Oxidase) नावाचे एन्झाइम असते. जोपर्यंत ही फळ किंवा भाजी कापली जात नाही, तोपर्यंत हे एन्झाइम पेशींच्या आत सुरक्षित असते.

मात्र, कापल्यानंतर या पेशी हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. ऑक्सिजन आणि एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य तयार होते, ज्यामुळे कापलेला भाग काळा किंवा तपकिरी दिसू लागतो.

कापलेले बटाटे आणि सफरचंद ताजे ठेवण्यासाठी तुम्ही घरगुती पर्याय नक्की वापरु शकता. बटाटे कापल्यानंतर लगेच थंड पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांचा हवेशी संपर्क तुटतो आणि ते काळे पडत नाहीत. हा सर्वात सोपा उपाय आहे.

जर तुम्ही सफरचंद कापले असेल आणि ते तुम्हाला थोड्यावेळाने खायचे असेल तर तुम्ही त्या फोडींवर थोडा लिंबाचा रस लावावा. लिंबातील व्हिटॅमिन-सीमुळे (Antioxidant) ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते.

तसेच एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाका. त्यात बटाटे किंवा सफरचंदाचे काप ठेवा. यामुळे रंग बदलत नाही, मात्र खाण्यापूर्वी सफरचंद एकदा धुवून घ्यावे.

जर तुम्हाला सफरचंद जास्त वेळ ताजे ठेवायचे असेल तर दोन कप पाण्यात दोन चमचे मध मिसळून त्यात सफरचंदाच्या फोडी ठेवाव्यात. साधारण ३-५ मिनिटांनंतर या फोडी काढून ठेवाव्यात. तसेच जर तुम्हाला कापलेली फळे लगेच वापरायची नसतील तर त्यांना क्लिंग फिल्मने घट्ट गुंडाळून किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे.

यासोबतच बटाटे किंवा सफरचंद काळे पडण्यापासून थांबवायचे असेल तर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर टाका. या पाण्यात कापलेले बटाटे किंवा सफरचंदाच्या फोडी २-३ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे त्यांचा रंग बराच वेळ पांढरा आणि ताजा राहतो. पण खाण्यापूर्वी किंवा शिजवण्यापूर्वी ते साध्या पाण्याने एकदा धुवून घ्यावे.