असं काय घडलं की पवारांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नेत्याचे सूर एकदम बदलले?
पंढरपुरात अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यावरच्या जप्तीची कारवाईची सध्या सोलापुरात चर्चा आहे. परवाच मविआचा प्रचार करणाऱ्या अभिजीत पाटलांचे सूर फडणवीसांच्या भेटीनंतर बदलले आहेत. पाटलांच्या माहितीनुसार, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करु, असं फडणवीसांनी त्यांनी सांगितलंय.
अभिजीत पाटल यांचे सूर बदलण्याचं कारण हे कारखान्यावर आलेली जप्ती आहे. पंढरपुरात विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे. त्याच कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील आहेत. कर्ज थकवल्याप्रकरणी 2021 साली कारखान्याविरोधात खटला भरला गेला. मात्र तेव्हापासून गेल्या शुक्रवारपर्यंत सहकार खात्याच्या कोर्टानं कारवाईवर स्टे दिला होता. गेल्या महिनाभरापासून अभिजीत पाटील माढा आणि सोलापूर लोकसभेत शरद पवार गटाचा प्रचार करत होते. 26 एप्रिलला अभिजीत पाटील मविआच्या प्रचारसभेत असतानाच इकडे त्यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. 39 कोटींच्या साखरेच्या पोत्यांसह कारखाना सील केला गेला. बातमी मिळताच अभिजीत पाटील सभा सोडून कारखान्याच्या दिशेनं निघाले. 28 एप्रिलला देवेंद्र फडणवीसांसोबत अभिजीत पाटलांची भेट झाली आणि 29 एप्रिलला मविआ सोडून अभिजीत पाटलांचे सूर महायुतीच्या बाजूनं बदलल्याचे दिसले.
अभिजीत पाटलांच्याच माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, असं आश्वानन दिलंय. त्यामुळे भविष्यात ३ दिवसांपूर्वी मविआच्या मंचावर दिसणारे अभिजीत पाटील उद्या महायुतीच्या मंचावर दिसू शकतात. अभिजीत पाटील म्हणतायत की कारखान्यावरची कारवाई मायबाप सरकारच वाचवू शकतं. म्हणजे कारखान्यावरची कारवाई महाराष्ट्र शिखर बँकेनं केलीय. ही बँक सहकार खात्याच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारच्याच अखत्यारित येते आणि अभिजीत पाटलांच्या मते त्यापासून दिलासा हवा असेल, तर तो सुद्धा महाराष्ट्र सरकारच देणार आहे. ईडीप्रमाणेच साखर कारखान्यांवरच्या कारवाईनं सरकार दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप विरोधक करत आले आहेत. मात्र सरकारनं हे आरोप वारंवार फेटाळले आहेत.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असतानाच सरकारनं त्यांच्या कारखान्याला 147 कोटी रुपयांची हमी दिली होती. त्यावेळीच भाजपच्याच प्रताप चिखलीकरांनी या हमीवरुन चव्हाण लवकरच भाजपात प्रवेश करु शकण्याचा अंदाज वर्तवला होता. योगायोगानं पुढच्या काही महिन्यात अशोक चव्हाण भाजपवासी झाले.
पंढरपूरचा कारखाना आणि घडामोडींची मालिका कशी घडली?
2021 सालाची पंढरपूरच्या साखर कारखान्यानं कर्ज थकवल्याची केस आहे. राज्य सहकारी बँकेचं मुद्दल आणि व्याज मिळून ४३० कोटी कारखान्यानं थकवले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीत आणि सध्या बीआरएसमध्ये असलेले भगिरथ भालकेंकडे कारखान्याची सूत्रं होती. मात्र जुलै 2022 ला कारखान्यात सत्तांतर झालं. भगिरथ भालकेंचा पराभव करत अभिजीत पाटलांचं पॅनल सत्तेत आलं. 7 मे 2023 याआधी कोणत्याही पक्षात नसलेल्या अभिजीत पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शरद पवारांनी प्रवेशाच्याच दिवशी पंढरपूर विधानसभेसाठी अभिजीत पाटलांची उमेदवारीही जाहीर केली. 3 जूनला अजित पवारांचा गट भाजपसोबत सत्तेत गेला. अभिजीत पाटील मात्र शरद पवार गटातच राहिले. यंदा माळशिरसचे मोहिते पाटील भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादीत परतले. त्यांच्या आणि सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या प्रचारात अभिजीत पाटील सक्रीय झाले. मात्र परवा कारखान्यावर जप्ती आली. काल फडणवीसांची अभिजीत पाटलांनी भेट घेतली, आणि आता भविष्यात अभिजीत पाटील महायुतीचा प्रचार करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारनं लोकसभेच्या तोंडावर 21 साखर कारखानदारांना कर्जाची गँरटी दिली. सरकारकडून कर्जाची गँरटी मिळालेल्या 21 पैकी बहुतांश कारखाने हे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. काही कारखाने अजित पवारांसोबत सत्तेत सामील झालेल्या नेत्यांचे आहेत. तर शरद पवार गट, काँग्रेस आणि अपक्ष नेत्यांचे प्रत्येकी २ कारखाने आहेत. एकीकडे विरोधक कारखान्यांच्या राजकारणावरुन सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. सरकार हे आरोप धुडकावत आहे. पण सदाभाऊ खोतांची विधानं मात्र विरोधकांच्या आरोपांना बळ देत आहेत.