आधी प्रकल्प नेले, आता अख्खं कॅबिनेटच गुजरातला… आदित्य ठाकरे यांची शिंदे-फडणवीसांवर सणकून टीका….
सरकारवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज बैठकीला एक तास दिला असता तर काय बिघडलं असतं..
मुंबईः ज्या राज्यात महाराष्ट्रातले प्रकल्प (Maharashtra Project) हलवले, त्याच राज्यात प्रचारासाठी महाराष्ट्राचं कॅबिनेट (Cabinet) नेलंय, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे. राज्यात एवढे मूलभूत प्रश्न असताना सरकारला गुजरात निवडणुकांसाठी वेळ आहे. मात्र मंत्रिमंडळ बैठकीसाठी खोके सरकार एक तासही वेळ काढू शकत नाही, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. आजची मंत्रिमंडळ बैठक का झाली नाही, असा घणाघाती सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर निघाले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सरकारवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्रिमंडळ गुजरात प्रचारात व्यस्त आहे. ओला दुष्काळ आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज बैठकीला एक तास दिला असता तर काय बिघडलं असतं.. ज्या राज्यात इथले प्रकल्प नेले, तिथे आता मंत्री आणि अख्ख कॅबिनेटच नेलंय. प्रचार करणं आवश्यक आहे. पण महाराष्ट्रासाठी यांनी एक तास तरी काढायला पाहिजे होता.
बिहारमध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे निघाले आहेत. मात्र या भेटीत थर्ड फ्रंट वगैरे काहीही हेतू नाही. मोठे नेते त्यावर चर्चा करतील. आजची भेट ही दोन तरुण नेत्यांमध्ये आहे. आम्ही आमच्या कामावर चर्चा करणार आहेत, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय.
दिशा सालियान हिचा मृत्यू प्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियानचा तोल गेल्यानं पडून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर काही आरोप करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला या घाणेरड्या राजकारणात पडायचं नाही. मी चिखलात पडणारच नाही.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीवर भाजपने टीका केली आहे. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ पीडीपीसोबत युती केली होती, त्यांनी आमच्यावर बोलू नये. तेजस्वी यादव यांची भेट घेत आहे. आम्ही दोघेही याच वयाचे आहोत. पर्यावरण, वगैरे इतर विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत….