आदित्य ठाकरेंची वरळीकरांना भावनिक साद, म्हणाले, ‘या’ कारणामुळे त्यांचं वरळीवर जास्त लक्ष!

| Updated on: Nov 21, 2022 | 3:08 PM

वरळी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

आदित्य ठाकरेंची वरळीकरांना भावनिक साद, म्हणाले, या कारणामुळे त्यांचं वरळीवर जास्त लक्ष!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः वरळीत (Worli) आपण केलेल्या कामामुळे सर्वच राजकीय पक्षांचं इथं लक्ष आहे. त्यांना इथे वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. त्यांनी इथे बेकायदेशीररित्या लावलेले बॅनर्स (Banners) हेच दाखवतात की, आपण इथे केलेली कामगिरी हेवा वाटण्यासारखी आहे.. अशा भावना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मांडल्या आहेत. आमचं सरकार पाडलं गेलं, पण आम्ही यापुढेही निःस्वार्थीपणे काम करतच राहू, असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातील नागरिकांना दिलंय.

आदित्य ठाकरे हे वरळीतील आमदार आहेत. आमदार पदाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्ताने माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळीकारांशी पत्राद्वारे संवाद साधला. पत्रात वरळीकरांना भावनिक साद घातली असून शिंदे गटाचे प्रत्यक्ष नाव न घेता टीका केली आहे. तसेच आमदार म्हणून वरळीत केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा त्यांनी माडंला आहे.

शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणतात की,

आपण केलेल्या कामांमुळे राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष. त्यांनी वरळीत बेकायदाशीर लावलेले बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावेसे वाटतेय.
यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोकहिताचा विचार करणारे सरकार पडलं गेलं. पण ते आम्हाला निःस्वार्थीपणे काम करण्यापासून आणि सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत.आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करीतच राहू आणि हेच प्रेम आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील…. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेसाठी विशेष रणनीती आखली आहे. अगदी दहिहंडीपासून, गणपती, गौरी, नवरात्र, दिवाळीदरम्यान, भाजपतर्फे वरळीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्वतः बहुतांश कार्यक्रमांना उपस्थिती लावली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे यांना भाजपाचं मोठं आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेशी पत्राद्वारे संवाद साधत आदित्य ठाकरे यांनी आपण केलेल्या कामांची आठवण करून दिली आहे.

वरळी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव करत विजय मिळवला होता. 67 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून आले. आता आगामी निवडणुकीत मात्र शिंदेगट भाजपाच्या महायुतीचे आव्हान आदित्य ठाकरे यांना पेलावे लागणार आहे.