
राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकेच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले. राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर 16 जानेवारी 2026 ला निकाल लागेल. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केली जात आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत निवडणुका लढत आहेत. राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राजकीय समीकरणे बदलल्याचे बघायला मिळतंय. भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र येत मुंबई महापालिका निवडणूक लढत आहेत. मात्र, इतर पालिकेत कुठे युती झाली तर कुठे स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच मुंबईच्या महापाैर पदावरून मोठा वाद निर्माण झाला.
मुंबई महापालिकेच्या महापाैर हा मराठीच होणार असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे महापाैर हा हिंदूच होणार असल्याचाही दावा केला जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महापौरपदावरून सुरू असलेला वाद चिघळत आहे. एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला जोरदार प्रतिउत्तर देत थेट मोठा दावा केला आहे. आता वारिस पठाण यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत असून दुसऱ्या मोठ्या वादाला तोंड फुटले.
वारिस पठाण यांनी म्हटले की, जर मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतो, तर मग एक मुस्लिम महिला महापौर का नाही होऊ शकत? धारावीतील एका सभेला संबोधित करताना वारिस पठाण म्हणाले की, हे विधान संविधान आणि लोकशाही या दोन्हींच्या विरोधात आहे. आमचे एक स्वप्न आहे की, एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल.
पुढे बोलताना वारिस पठाणने म्हटले, मला एक सांगा की, मी महादेवावर प्रेम करतो, असे म्हणणारी व्यक्ती महापाैर होऊ शकते तर मग हिजाब घालणारी आणि कलमा पठण करणारी मुस्लिम महिला का महापाैर होऊ शकत नाही? अगोदरच मनसे आणि भाजपामध्ये महापाैर पदावरून वाद सुरू असतानाच त्यामध्ये आता एआयएमआयएम देखील या वादात उडी घेतल्याचे बघायला मिळत आहे