तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता का? पार्थ पवारांवरुन अजित पवारांचा प्रश्न

| Updated on: Oct 02, 2020 | 8:13 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar on controversial tweet of Parth Pawar on Maratha Reservation).

तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता का? पार्थ पवारांवरुन अजित पवारांचा प्रश्न
Follow us on

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar on controversial tweet of Parth Pawar on Maratha Reservation). यावेळी त्यांनी तुम्ही तुमची मुलं काय ट्विट करतात हे पाहता किंवा विचारतात का? असा प्रश्न विचारला आहे. यातून त्यांनी आपण पार्थ पवार यांच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नसल्याचंच सूचकपणे सांगितलं आहे. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केल्याचंही म्हटलं. ते आज पुणे स्टेशन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले असता बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “पार्थने जे ट्विट केलं त्यावर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे. तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता किंवा विचारता का?”

पार्थ पवार काय म्हणाले होते?

पार्थ पवार यांनी विवेक रहाडेचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून हे ट्विट केलं आहे.

”विवेकनं आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचं भवितव्य अंधकारमय झालं आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही,’ असं पार्थ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून माझ्या मनातील मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल पुढे नेण्यास मी तयार आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा घटना घडण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवाय अर्थ खात्यापासून ते गृहखात्यापर्यंतची महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. असं असताना पार्थ यांनी हे ट्विट करून राज्य सरकारला एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून पार्थ यांच्या या ट्विटमुळे राज्य सरकारही कोंडीत सापडलं असल्याची चर्चा आहे.

“सरकार कुणाचंही असु द्या, महिलांच्या बाबतीत असं घडणं वाईट”

यावेळी अजित पवार यांनी हाथरसच्या घटनेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “हाथरसची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज महिला विविध पातळींवर काम करत आहेत. असं असताना अशा घटना घडणं दुर्दैवी आहे. कुणाचंही सरकार अस द्या, महिलांच्या बाबतीत असं घडणं वाईट आहे.”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना हाथरस पीडितेच्या कुटुबियांना भेटून देण्यापासून रोखण्याबाबत आणि धक्काबुक्कीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “अशा घटना घडल्यावर कोणीही भेट द्यायला जाऊ शकतं. पूर्ण माहिती घेणं गरजेचं असतं. पण भेटायला जाताना अशी अडवणूक का केली हे माहिती नाही. कोणीही सत्तेवर असताना कुणाला असं थांबवू नये. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर गोष्ट वेगळी आहे.”

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

पार्थ आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने : चंद्रकांत पाटील

संबंधित व्हिडीओ :

Ajit Pawar on controversial tweet of Parth Pawar on Maratha Reservation