भाजप नेत्यांना नैराश्य, त्यांचे चेहरे पडलेले : अजित पवार

| Updated on: Dec 14, 2020 | 1:10 AM

"राज्यातील भाजप नेत्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मीसुद्धा पाहिली. भाजप नेत्यांचे चेहरे पडलेले आहेत, असे अजित पवार म्हणाले. (Ajit pawar BJP leader)

भाजप नेत्यांना नैराश्य, त्यांचे चेहरे पडलेले : अजित पवार
Follow us on

मुंबई : “राज्यातील भाजप नेत्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मीसुद्धा पाहिली. भाजप नेत्यांचे चेहरे पडलेले आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेत उत्साह नव्हता,” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा तसेच त्यांचा आरोपांचा समाचार घेतला. सोमवारपासून (14 डिसेंबर) विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले. (Ajit pawar criticizes BJP leader said that opposition leaders are demoralised)

सोमवरापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी शासकीय चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, भाजपने या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टकला. त्यानंतर भाजपने पत्रकार परिषद बोलवत महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली. तसेच, महाविकास आघाडी सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी राबवली जात आहे, असा गंभीर आरोप केला.

त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित करत, विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. यावेळी बोलताना “राज्यातील भाजप नेत्यांची पत्रकार परिषद मीसुद्धा पाहिली. त्यांच्या पत्रकार परिषदेत उत्साह नव्हता. त्यांचे चेहरे पडलेले आहेत. राज्यातील विधानपरिषदेच्या 6 जागांचा निकाल लागल्यानंतर त्यांचे मनोधैर्य खचले आहे,” असे म्हणत अजित पवार यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.

केंद्र सरकारकडे 28 हजार कोटी रुपये थकले

यावेळी बोलताना राज्याला अनके नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागल्याचं अजित पवार म्हणाले. तसेच, सरकार अनेक अडचणींना तोंड देत समोर जात आहे, असेही त्यांनी सांगितलं. सोबतच राज्य एवढ्या साऱ्या संकटांतून जात असताना केंद्र सरकारने राज्याचे 28 हजार कोटी रुपये थकवल्याचे सांगितले. “राज्य सरकारचे आठ महिने कोरोना महामारीमध्ये गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी माहिती घेतली. त्यामध्ये आम्हाला समजलं की, केंद्र सरकारकडे जीएसटी आणि इतर कर मिळून राज्याचे एकूण 28 हजार कोटी रुपये थकले आहेत, असे अजित पवार म्हणाले.

सरकार पुढे जात आहे, काम करत आहे

तसेच, असे असले तरी राज्यात अतिवृष्टी झाली, कोरना महामारीचे संकट आले, चक्रीवादळ आलं, राज्यात कपाशीचं नुकसान आलं, पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.  एवढी सारी संकटं समोर असताना असताना सरकार काम करत आहे. पुढे जात आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच, राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना पवार यांनी फेटाळलं. (Ajit pawar criticizes BJP leader said that opposition leaders are demoralised)

दरम्यान, राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन मुंबईत येथे होणार आहे. सोमवारापासून (14 डिसेंबर) या अधिवेशनास सुरुवात होईल. विरोधी पक्षाने राज्य सरकारवर केलेली गंभीर टीका. विरोधकांच्या टिकेला सत्ताधाऱ्यांनी चोख उत्तर, तसेच दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता आगामी हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संबंधित बातम्या :

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल

ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

मुंबईकरांचा बेफिकीरपणा, विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

(Ajit pawar criticizes BJP leader said that opposition leaders are demoralised)