मुख्यमंत्र्यांकडून आरोप- “वेदांता प्रकल्प टक्केवारीमुळे गेला”, शिंदे यांच्या आरोपावर अजित पवार म्हणतात…

| Updated on: Oct 06, 2022 | 9:46 AM

अजित पवार म्हणाले, ' मुख्यमंत्र्यांनी सभागृहात रिप्लाय देतानाही सांगितलं होतं. वेदांता येतोय... तुम्हीच सांगितलं असताना टक्केवारी... हे काहीतरी बोलायचं... याला अर्थ नाही...

मुख्यमंत्र्यांकडून आरोप- “वेदांता प्रकल्प टक्केवारीमुळे गेला”, शिंदे यांच्या आरोपावर अजित पवार म्हणतात…
अजित पवार, विरोधी पक्ष नेते, विधानसभा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणेः शिवसेनेनं (Shivsena) टक्केवारीनं कमिशन मागितल्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलाय. यावर महाविकास आघाडीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टच उत्तर दिलंय. टक्केवारी मागितली हा आरोप धादांत खोटा आहे. आरोप करत असाल तर तो सिद्धही करून दाखवा, असं आव्हान अजित पवार यांनी दिलंय. केवळ राजकीय टिप्पण्या करायच्या म्हणून काहीतरी बोलण्याला अर्थ नाही. तर शिंदे सरकारच्या चुकांमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाय, असं अजित पवार म्हणाले.

विजया दशमीच्या दुसऱ्या दिवशीच अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. मुंबईतल्या शिवसेनेच्या दोन मेळाव्यांवरही त्यांनी भाष्य केलं.

वेदांता प्रकल्पावरून शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ टक्केवारी मागितली हे धादांत खोटं आहे. कुणी आरोप करत असेल तर त्याने सिद्ध करून दाखवावं. कारण वेदांताबद्दल मी मीडियाला दाखवलं होतं. एक मीटिंग शेवटची झाली होती.

चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली जुलैत मीटिंग झाली होती. सरकार जूनमध्ये गेलं. जुलैत हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली. त्यात हाच विषय होता. आज त्यांना वेदांता गेला हे त्यांच्या चुकांमुळे गेलंय… 2 लाख तरुणांचा रोजगार गेलाय. तरुणांचा रोष आपल्यावर येईल, हे लपवण्याकरिता त्यांनी हे वक्तव्य केलंय, असा आरोप अजित पवारांनी केला.

ते म्हणाले, ‘ मुख्यमंत्र्यांनी सभागृहात रिप्लाय देतानाही सांगितलं होतं. वेदांता येतोय… तुम्हीच सांगितलं असताना टक्केवारी… हे काहीतरी बोलायचं… याला अर्थ नाही…

शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांवर अजित पवार यांनी फार भाष्य केलं नाही. ते म्हणाले, ‘
दसऱ्यासारखा महत्त्वाचा सण असताना उभ्या महाराष्ट्रानं हे मेळावे पाहिले… हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याने सर्वांना कुतूहल होतं. दोन्हीकडे गर्दी होती. कशी गर्दी होती.. हेही पाहिलं..

या राजकीय बाबी आहेत. बारकाईनं विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेनी, मतदारांनी, शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचाय… पुढची भूमिका घेतली पाहिजे..

झेंडा शिवसेनेचा अजेंडा राष्ट्रवादीचा असा आरोप शिंदेंनी केलाय. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, याला काहीही अर्थ नाही. कारण तेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात होता. माझ्या उजव्याच बाजूला ते बसायचे.. तेव्हा काही म्हणाले नाहीत. तिथं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही होती. अनेक वर्षांचा आम्हाला अनुभव आहे.