राणा-कडू वाद ‘गोड’ झाला?; चार तासांच्या बैठकीनंतर राणा म्हणाले…

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. हा आरोप बच्चू कडू यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

राणा-कडू वाद गोड झाला?; चार तासांच्या बैठकीनंतर राणा म्हणाले...
राणा-कडू वाद 'गोड' झाला; चार तासांच्या बैठकीनंतर राणा म्हणाले...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 31, 2022 | 10:18 AM

मुंबई: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला बच्चू कडू (bacchu kadu) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासोबत झालेल्या चार तासांच्या बैठकीनंतर रवी राणा यांनी वाद मिटल्याचं जाहीर केलं आहे. ऑल इज वेल आहे. हम साथ साथ है, असं म्हणत रवी राणा यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

आमदार रवी राणा मुंबईत आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चार तास चर्चा केली. यावेळी बच्चू कडूही उपस्थित होते. त्यानंतर रवी राणा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जायला निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी रवी राणा यांचा चेहरा पडलेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. शिवाय बोलतानाही ते अत्यंत नरमाईने बोलत होते.

रवी राणा यांनी मीडियाशी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. आमच्यात सर्व ऑलवेल आहे. आमची 3 ते 4 तास मिटिंग झाली. तिथे सविस्तर भूमिका मांडली. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माझी भूमिका मांडणार आहे. सर्व ऑलवेल आहे. हम साथ साध है, असं सांगतानाच वाद मिटला म्हणूनच बैठकीला तीन घंटे लागले, असं राणा म्हणाले.

दरम्यान, रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. हा आरोप बच्चू कडू यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी रवी राणा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसेच 1 नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध करण्याचं आव्हानच बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिलं होतं. दोघेही पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर तुफान हल्ले करत होते. दोघांच्याही भाषेचा स्तरही घसरला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतरही दोघांची शाब्दिक चकमक सुरूच होती.

या सर्व पार्श्वभूमीवर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर संवाद साधला. तिन्ही नेत्यांमध्ये तीन ते चार तास बैठक झाली. यावेळी रवी राणा यांनी सपशेल माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे.