शहांनी एका महिन्यात निवडणुका घ्याव्यात, मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण?; दानवेंचं आव्हान
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राणेंच्या या टीकेचा दानवे यांनी शिवसेना स्टाईलनेच समाचार घेतला. ज्या शिवसेनेने राणे यांना भरभरून दिले त्यांच्यावर टीका केली.
मनमाड: राज्यातील भाजप (bjp) म्हणजे विझलेला दिवा आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी केली आहे. अमित शहा (amit shah) जर सूर्य असतील तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका महिन्यात निवडणुकीला सामोरे जाण्याचे दिलेले आव्हान स्वीकारावे, असं आव्हानच अंबादास दानवे यांनी दिलं. मनमाड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आधी उद्धव ठाकरे यांनी एका महिन्यात निवडणुका घेण्याचे दिलेले आव्हान स्वीकारा. मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण? निवडणुका घेण्यासाठी सरकार वारंवार चालढकल करत असून पळ काढत आहेत. उद्धव ठाकरे यांचे आव्हान भाजप पेलू शकत नाही म्हणून असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. एक दिवा काय करू शकतो हे बावनकुळेंना सांगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राणेंच्या या टीकेचा दानवे यांनी शिवसेना स्टाईलनेच समाचार घेतला. ज्या शिवसेनेने राणे यांना भरभरून दिले त्यांच्यावर टीका केली. ही नारायण राणे यांची नमकहरामी असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार रजुभाऊ देशमुख, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, संपर्क नेते जयंत धिंडे, सह संपर्कप्रमुख प्रवीण नाईक, अल्ताफ खान, जिल्हाप्रमुख गणेश धत्रक, उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, संतोष बळीद, संजय कटारिया, तालुका प्रमुख विलास भवर, संतोष गुप्ता, शहरप्रमुख माधव शेलार, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिलाघडी, चे सर्व तालुकाप्रमुख, विभागप्रमुख,शाखाप्रमुख, गटप्रमुख व शिवसैनिक आदींची उपस्थित होते.