अंधेरी निवडणुकीत ‘बाय’ मिळणार? सहानुभूतीची लाट तेजीत, प्रताप सरनाईकांच्या ‘मित्रत्वा’वर कुणाचे ताशेरे?

| Updated on: Oct 17, 2022 | 11:58 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली आहे.

अंधेरी निवडणुकीत बाय मिळणार? सहानुभूतीची लाट तेजीत, प्रताप सरनाईकांच्या मित्रत्वावर कुणाचे ताशेरे?
Image Credit source: social media
Follow us on

गिरीश गायकवाड,  मुंबईः स्व. रमेश लटके (Ramesh Latke) यांच्याशी तुमचे एवढे मैत्रीपूर्ण संबंध होते तर त्यांच्या पत्नीविरोधात राजकारण करताना कुठे गेली होती मैत्री? असा खणखणीत सवाल प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना विचारण्यात आलाय. शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जानवळ यांनी प्रताप सरनाईक यांना हे पत्र लिहिलंय. उशीरा का होईना, तुमच्यातला मित्र जागा झालाय, असंही त्यांनी लिहिलंय. मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. एवढ्या नाट्यमय हालचालीनंतर आता या निवडणुकीत ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना बाय मिळतो की काय अशी चिन्ह आहेत. कारण येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर पत्नी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, या मागणीने आता जोर धरला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीत आधी अडथळे आणले गेले. अखेर हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. लटके यांच्या विरोधात मुरजी पटेल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिंदे गट आणि भाजप अंधेरीतील या जागेसाठी पूर्ण ताकद पणाला लावेल तर शिवसेनाही अवघं बळ एकवटेल, अशी चिन्ह दिसत असतानाच ऋतुजा लटके यांच्या प्रती सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याविषयी विनंती केली. स्व. रमेश लटके आणि माझे मित्रत्वाचे संबंध होते, याची आठवण त्यांनी सांगितली.

त्याच मित्रत्वाचा धागा पकडत उद्धव ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानवळ यांनी प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलंय. आता अनेकजण अशी मागणी करतायत, पण २९ सप्टेंबर २०२२ रोजीच मी देवेंद्र फडणवीस यांना हीच मागणी करणारं पत्र लिहिलं होतं, याचीही आठवण जितेंद्र जानवळ यांनी करून दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती रविवारी केली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही याच भावना व्यक्त केल्या. त्यावर जितेंद्र जानवळ यांनी खणखणीत उत्तर दिलंय. मात्र एकूण सहानुभूतीची लाट तेजीत असल्याचं चित्र आहे.