राष्ट्रवादीच्या 9 पैकी किती मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप?; अंजली दमानिया यांनी आकडाच सांगितला

राज्यात नवीन समीकरणे तयार झाली आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये समील झाला आहे. या बदलत्या समीकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीच्या 9 पैकी किती मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप?; अंजली दमानिया यांनी आकडाच सांगितला
anjali damania
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 04, 2023 | 7:32 AM

मुंबई : राज्यातील नवीन समीकरणे तयार झाली आहेत. कालपर्यंत एकमेंकाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले भाजप आणि राष्ट्रवादी आज एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचा एक गट भाजपला जाऊन मिळाला असून सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात महायुती निर्माण झाली असून महाविकास आघाडीची ताकद कमकुवत झाली आहे. पहिल्यांदाच राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रचंड संतापल्या आहेत. सध्याचं राज्यातील राजकारण हे अत्यंत गलिच्छ असल्याची घणाघाती टीकाच दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल जो राज्यात मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यामुळे मला जाम संताप आला आहे. माझ्या मनात जाम आक्रोश आहे. हे गलिच्छ राजकारण सुरू आहे. त्याला कसं संपवणार? याला राजकारण म्हणायचं की पैसा कमवायचा मार्ग? पूर्वीचे राजकारणी विचार मांडायचे. लोकांना ते पटायचे आणि त्यानुसार मार्गक्रमण करायचे. पण आजच्या स्थितीत राजकारणात भलतच सुरू आहे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

या नेत्यांना चाणक्य म्हणणार का?

काही राजकारण्यांना तुम्ही चाणक्य म्हणत आहात. ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून नेत्यांना आपल्या पक्षात आणणाऱ्या नेत्यांना तुम्ही चाणक्य बोलणार का? एप्रिलपासून मला माहिती होती आणि या संदर्भात मी ट्विट सुद्धा केलं होतं. अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं मी आधीच सांगितलं होतं. काल आपल्याला तेच पाहायला मिळालं, असंही त्या म्हणाल्या.

हे चाललंय काय?

आता काय चाललंय. ज्यांची ईडीची चौकशी सुरू होती अरे ते आता मंत्रीपदाची शपथविधी घेत आहेत. 9 पैकी 7 नेत्यांची ईडीची चौकशी सुरू आहे. त्यांना तुम्ही मंत्रीपदाची शपथ दिली. आता हेच नेते तुमच्यासोबत आहेत. हे चाललंय का? या संदर्भात अनेक पुरावे आहेत, असंही त्या म्हणाल्या.

त्यांना धडा शिकवा

या सात जणांच्या भ्रष्टाचाराबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं. त्यांना मी कागदपत्रेही दिले होते. पण त्यांनी कधी गांभीर्याने घेतलं नाही. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. सर्व राजकीय नेत्यांच्या घोटाळ्याचे पुरावे आहेत. पण ते काही आता कामाचे नाही. मी ते अरबी समुद्रात टाकणार आहे, असं सांगतानाच आता कोणी विरोधी पक्षच राहिला नाही. हे विरोधकांना आपल्यात घेत आहेत म्हणजे नक्की काय आहे? कुठे आहे या लोकशाही आणि लोकांनी नक्की काय करायचं? सामान्य नागरिकांनी एकत्रित येऊन या लोकांना धडा शिकवला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

Follow Us