उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसणार… आमदार आणि नगरसेवकही फोडणार… गुलाबराव पाटील यांची भरसभेतच घोषणा…
वर्धापन दिनाचा हिरकमहोत्सवी ६० हा आकडा नाही, संस्कार आहे. निष्ठा आहे. संघर्षाचा आधार आहे असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन शिवसेनेच्या दोन गटानी आयोजित केला आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्षात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी फूट पाडत लोकसभेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर आज या सहा खासदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात व्यासपीठावर आणणार का याकडे लक्ष लागले आहे. गोरेगावच्या नेस्को येथे एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्यात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले.
मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की वर्धापन दिनाचा हिरकमहोत्सवी ६० हा आकडा नाही, संस्कार आहे. निष्ठा आहे. संघर्षाचा आधार आहे. १९८६ मध्ये मी शिवसेनेत आलो. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचं काम सुरू केलं. आज आठवतंय, त्या ६० वर्षाची फलश्रृती म्हणून गर्दी दिसत आहे. यात शिवसैनिक दिसत आहेत. ४०-४० वर्ष काम करणारे शिवसैनिक आणि नवे शिवसैनिक आहेत. त्यावेळी सत्ता नव्हती, पैसा नव्हता, वाहनं नव्हती, फक्त एकच विश्वास होता मराठी माणसांवर होणारा अन्याय आणि हिंदूवर होणारा अन्याय आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी संघटनेच्या विचाराच्या भरवश्यावर काम सुरू झालं. तेव्हा मोबाईल नव्हता, एसी नव्हता, सायकलवरून प्रचार व्हायचा. एकच ध्यास होता तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांचा होता असेही पाटील म्हणाले.
युतीचं बहुमत आलं आणि त्यात ठिगणी पडली. समविचाराशी लोकांशी फारकत घेऊन ज्या विचाराला विरोध केला त्या पक्षाला आय लव्ह यू म्हटलं. ज्या मोटर सायकल चालवायचं लायसन्स नव्हतं त्यांने ट्रक चालवायला घेतली. घरातून सत्ता चालवली गेली. टोळकं जमलं, ऑनलाईन सत्ता राबवली गेली. म्हणून बंड गेलं. एकनाथ शिंदे कोण आहे विचारलं गेलं. हा महाराष्ट्राचा टायगर आहे. वाघ आहे. आम्ही गुवाहाटीत गेलो. आम्ही तिथून निघालो. ते म्हणाले, ४० रेडे मुंबईत आले तर कापले जातील. आम्ही ४० रेडे मुंबईत आलो आणि सत्ता स्थापन केली असा घणाघात यावेळी गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.
सहा लोकं पैशामुळे फुटले. अरे सोन्या तुमचे वडील मुख्यमंत्री होते. गावागावात फिरले असते आणि आमदारांची नाराजी दूर केली असती. तर हे दिवस आले नसते. शिंदेंचा मुलगा बघा गावागावात जातोय. लोकांना भेटतोय. काम करतोय. हेच काम तू केलं असतं सोन्या तर हे दिवस आले नसते. तुम्हाला एक मुलगा आलाय आणि सोन्यासारखा आलाय हीच तुमची संपत्ती आहे. त्यांचं पोट्ट एसीत बसलंय. संजय राऊत पक्ष संपवणार आहे. याला म्हणतो मारेन, त्याला म्हणतोय मारेन. आम्ही असेच निवडून आलोय का?. आमच्या मागच्या गुन्ह्याची हिस्ट्री काढ. तू बाळासाहेबांच्या आशीर्वादाने खासदार झाला. आम्ही तर जनतेतून निडून आलोय. हा छोटासा झटका आहे. विधानसभेचा दणका बाकी आहे. महापालिकेचा मोठा चटका द्यायचा आहे. आणि शिंदे देणारच आहे असा दावा गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.