मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा आणि टीकेला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले भाजप नेते?

| Updated on: Jan 01, 2022 | 5:21 PM

मुंबईतील 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा त्यांनी आज केली. त्याचबरोबर ठाकरे यांनी यावेळी भाजप नेत्यांवरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा आणि टीकेला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले भाजप नेते?
अतुल भातखळकर, किरिट सोमय्या, केशव उपाध्ये
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर आज पहिल्यांदाच जनतेसमोर आले. नगरविकास खात्याची (Urban Development Department) महत्वाची बैठक आज पार पडली. त्यावेळी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलाय. मुंबईतील 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा त्यांनी आज केली. त्याचबरोबर ठाकरे यांनी यावेळी भाजप नेत्यांवरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.

भाजप आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केलीय. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा राजकीय आणि नाट्यमय आहे. विधानसभेत देवेंद्र फडमवीस आणि भाजपचे आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. वचननाम्यात आश्वासन दिलं असताना 2 वर्षे का लागली? तसंच मुंबईकरांना मोफत लस देणार असं युवराजांनी ट्वीट वर ट्वीट केलं होतं. त्याचं काय झालं? असा सवाल भातखळकर यांनी केलाय.

शिवसेनेनं मुंबईला लुटलं आणि बुडवलं- सोमय्या

तर शिवसेना फक्त पब्लिसिटी करते. पहिल्या पावसात का हाल होतात. 25 वर्षे शिवसेना सत्तेत आहे केलं काय? शिवसेनेनं मुंबईला लुटलं आणि बुडवून दाखवलं. लुटण्याचे धंदे बंद करा आणि मुंबईचं भलं करा, अशी जोरदार टीका माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उपाध्येंचं प्रत्युत्तर

तर मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांना वचनं देऊन फसवणारे अनेकजण आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर ‘यात अग्रस्थानी आपलेच नाव येणार कारण आपण २०१९ विधानसभेच्या निवडणूकीत काय भाषणे केली आठवत असतीलच. कॅाग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार भाषण करीत युतीच वचन लोकांना दिल आणि सत्तेसाठी याच महाराष्ट्रातील लोकांना फसवलं’, अशा शब्दात उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे.

ठाकरे सरकारचा निर्णय काय?

मुख्यमंत्री ठाकरे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे. 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांचे जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे.

उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

‘राजकारण म्हटल्यावर आपण काही केलं तर भ्रष्टाचार केला, नाही केलं तर यांनी काहीच केलं नाही. मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आम्ही हे करु, आम्ही ते करु आणि यालाच तर राजकारण म्हणतात. अनेकजण असे आहेत की वाटेल ते सांगतात. आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्षे काही बोलायचं नाही. मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात की, तुमच्यासाठी तारे तोडून आणू, मग लोकं बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढलाय.

इतर बातम्या :