याकूबची बॉडी नातेवाईकांना देऊन हे थडगं उभं केलं, तुम्हीच माफी मागा… भास्कर जाधव आक्रमक

भाजपनेच काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय उकरून काढला होता. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून हळू हळू ते कब्रस्तानकडे जात आहेत, असा टोला जाधव यांनी लगावला.

याकूबची बॉडी नातेवाईकांना देऊन हे थडगं उभं केलं, तुम्हीच माफी मागा... भास्कर जाधव आक्रमक
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 4:51 PM

रत्नागिरीः मुंबई स्फोटांचा दोषी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीवरून भाजप आणि शिवसेनेदरम्यान (Shivsena) चांगलाच वाद चिघळलाय. काल याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीचे फोटो ट्वीट करून भाजप (BJP) नेत्यांनी हे कुणाच्या आशीर्वादानं होतंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला होता. मात्र याकूब मेमनची कबर कोणत्या सरकारच्या काळात बांधण्यात आली, हे तुम्हीच सांगा, असा प्रत्यारोप शिवसेनेनं केला. भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कोकणातले आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी या मुद्द्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हीच याकूब मेमनची बॉडी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी माफी मागण्यापेक्षा आधी भाजपनेच जनतेची माफी मागितली पाहिजे, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलंय.

गणपती उत्सव सुरु असताना जनतेची डोकी भडकवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप जाधव यांनी केला. गणेशोत्सवात काल दिवसभर याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उकरून काढण्यात आला. यामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय, असा आरोप जाधव यांनी केला.

ते म्हणाले, याकूब मेमनची कबर असलेली ती जागा खासगी आहे. सरकारी किंवा महापालिकेने तिथे एकही पैसा खर्च केलेला नाही. थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करणं चुकीचं आहे….

काल भाजपचे बरेच विद्वान लोकं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांना माफी मागायला सांगत होते. पण आता तुम्ही बॉडी दिली तर आधी तुम्ही माफी मागा, असं वक्तव्य जाधव यांनी केलं.

भाजपनेच काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय उकरून काढला होता. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून हळू हळू ते कब्रस्तानकडे जात आहेत, असा टोला जाधव यांनी लगावला.

गुहागरमध्ये एका वादग्रस्त वक्तव्यामुळे भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला जातोय, यावर बोलताना ते म्हणाले, ‘3 तारखेला माझा गुहागरमध्ये सत्कार झाला. मी राज्यातल्या जनतेला आव्हान केलं होतं. मुस्लिम बांधवांना मी डोकी शांत ठेवा, निवडणुका जवळ येत आहेत, असं आवाहन केलं होतं. संयम ठेवा, तुम्हाला कुणीतरी उचकवण्याचा प्रयत्न करेल. खोटे आरोप करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करेल. असं म्हटलं होतं. त्यात माझं काही चुकलं असं वाटत नाही, असं स्पष्टीकरण जाधव यांनी दिलंय.