भावना गवळी उमेदवारीवर ठाम, पण शिवसेनेकडून हे नाव चर्चेत
वाशिम यवतमाळ मतदारसंघातून पाच वेळा खासदार भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यांना यावेळी तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने भाजप त्यांना उमेदवारी देण्याच्या विचारात नाहीये. त्यामुळे येथून नवीन उमेदवार दिला जावू शकतो.
![भावना गवळी उमेदवारीवर ठाम, पण शिवसेनेकडून हे नाव चर्चेत भावना गवळी उमेदवारीवर ठाम, पण शिवसेनेकडून हे नाव चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/MNS-3.jpg?w=1280)
Loksabha election : वाशिम-यवतमाळ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. मात्र अजून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीच जाहीर झालेली नाही. विद्यमान खासदार भावना गवळी अजूनही वेटिंगवरच असून त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीये. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भावना गवळी यांनीच उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा असून, त्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्याची माहिती आहे. पण राठोडांनी लढावं अशी इच्छा शिंदे गटाच्या कोअर टीमची आहे.
फडणवीसांची घेतली भेट
सोमवारी रात्री भावना गवळी यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भावना गवळी की संजय राठोड या दोघांपैकी एकाचा फौसला अद्याप झालेला नसला तरी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. संजय देशमुखांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यवतमाळमध्ये आले होते. शक्तिप्रदर्शन करत संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
रोहित पवारांनीही महायुतीकडे उमेदवार आहे का ? अशी टीका करत भावना गवळींना लक्ष केलं. तर लवकर उमेदवारी घोषित न करणे हा सुद्धा एक प्लॅन असतो असं मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. मेरी झांसी नहीं दूंगी म्हणत, शेवटच्या क्षणापर्यंत भावना गवळी उमेदवारीवर ठाम आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस राहिले असतानाही त्या मुंबईत तळ ठोकू आहेत.
तिकीट कापलं जाणार?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी जाहीर न झाल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक यामुळे वाढली आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येत असताना अनेक नेते आणि कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.
भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत. महत्त्वाचे म्हणजे सलग पाचवेळा त्या या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. पण भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे आता भावना गवळी यांना उमेदवारी मिळते की नाही, त्यांना उमेदवारी नाकारली तर मग कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.