काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले; उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळींचे प्रत्युत्तर

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर भावना गावळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. यावरुन उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर वर टीका केली आहे.

काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले; उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळींचे प्रत्युत्तर
vanita kamble | Updated on: Sep 22, 2022 | 4:08 PM

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray‘) शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधत आहेत. बुधावरी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी वाशिमच्या खासदार भावना गवळींवर(Bhavna Gawli) टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भावना गावळींनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर भावना गावळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. यावरुन उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर वर टीका केली आहे.

खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप झाले. यानंतर आता त्यांना क्लिन चीट दिली जात आहे. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला, असा सवालही उद्धव यांनी टीका करताना उपस्थित केला होता.

यावर भावना गवळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले असं भावना गवळी म्हणाल्या. रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करू नये असं म्हणत भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून मी माझ्या मतदार संघातील एक लाखा पेक्षा जास्त बांधवाना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री , माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे असे भावना गवळी म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली. उद्धव ठाकरे नैराश्यातून असे विधानं करत असल्याचे त्या म्हणाल्या.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही भावना गवळी यांनी भाष्य केले आहे. भाजपने काय माणसं धुवायची लॉंड्री काढली आहे काय? असा सवाल भावना गवळी यांनी उपस्थित केला.

Follow Us