वासरु मारलं तर सरकारची गाय मारण्याची भूमिका अयोग्य, राणेंवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 24, 2021 | 1:41 PM

मी आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं, ते स्वत:ला छत्रपती समजतात का? की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा. कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला. मुळात हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, तुम्हाला आधी त्यांची बाजू ऐकावी लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल, असंही फडणवीस म्हणाले

वासरु मारलं तर सरकारची गाय मारण्याची भूमिका अयोग्य, राणेंवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis, Narayan Rane
Follow us on

मुंबई : वासरु मारलं तर गाय मारण्याची सरकारची भूमिका अयोग्य आहे, भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीने नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वाक्याने मोठा वाद निर्माण झालाय. मुळात राणे साहेब बोलण्याच्या ओघात हे झालं असावं. पण मुख्यमंत्री स्वातंत्र्य दिन विसरतात तेव्हा कोणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे. भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीनं राणेंसोबत आहे. ज्या पद्धतीनं कारवाई होतेय ही चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“भाजप राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण…”

एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना यामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं बिलकुल समर्थन करु शकत नाही. एखाद्याने वासरु मारलं म्हणून आम्ही गाय मारु, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

“नाशिक पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?”

खरं म्हणजे ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केलीय, मला आश्चर्य वाटतंय, शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो, हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता, आणि आज मात्र अख्खं पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी आलंय. एक पोलीस पथक नाशिकहून, एक पुण्याहून निघालं आहे. कायद्याप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेसन्स नाही, मी आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं, ते स्वत:ला छत्रपती समजतात का? की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा. कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला. मुळात हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, तुम्हाला आधी त्यांची बाजू ऐकावी लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल, असंही फडणवीस म्हणाले.

“प्रामाणिक पोलिसांबाबत नजर बदलली”

ज्याप्रमाणे पोलिसांचा गैरवापर सुरु आहे, महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, पाच वर्ष मी काम केलं आहे. संपूर्ण देशात नि:पक्ष पोलीस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे, सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस कारवाई करायला लागले, तर महाराष्ट्राची प्रतिमा तशी राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांड झाली आहेत, त्यामुळे प्रामाणिक पोलिसांबाबत नजर बदलली आहे, अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.

“ही ताकद शर्जिल उस्मानीबाबत दाखवा”

अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने सरकार पोलिसांचा वापर करत आहे, मला वाटतं पोलिसगिरी करत आहेत. प्रत्येकवेळी कोर्टाकडून चपराक बसत आहे. अर्णवपासून कंगनापर्यंत सर्व ठिकाणी चपराक बसल्या. हे जे चालू आहे ते योग्य नाही. मी सल्ला देतो, कायद्याने काम करा, बेकायदेशीरपणे काम करणारे पोलीस सध्या कुठे आहेत ते मी सांगण्याची गरज नाही. एकाच ऑफेन्सला तीन तीन गुन्हे दाखल होतात, ही ताकद शर्जिल उस्मानीबाबत दाखवा, पुन्हा सांगतोय राणे साहेबांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण सरकार पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे ते पाहता भाजप राणेसाहेबांच्या पूर्ण पाठिशी आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

“आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करा”

शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला.

“जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही”

अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही. ही जी कारवाई आहे ती अयोग्य आहे हे मी स्पष्टपणे सांगतो, असा पुनरुच्चार फडणवीसांनी केला.

संबंधित बातम्या :

‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी, फडणवीसांकडून भूमिका जाहीर

राणेंना अटक केली तर जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार? फडणवीसांकडून प्लॅन जाहीर