संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?; नारायण राणेंची टीका

| Updated on: Oct 26, 2020 | 5:37 PM

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली.

संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?; नारायण राणेंची टीका
Follow us on

मुंबई: शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहील या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी समाचार घेतला. शिवसेना 25 वर्षे सत्तेत राहणार? कोणत्या धुंदीत आहात?, असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. (bjp leader narayan rane attacks sanjay raut)

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. काल संजय राऊत यांनी शिवसेना सत्तेतील पाच वर्षे पूर्ण करणार असं सांगितलं. त्यानंतर 25 वर्षे शिवसेना सत्तेत राहील असंही सांगितलं. दुसरीकडे आमचं सरकार पाडा असं आव्हानही दिलं. दिल्लीतून 200 कोटी आणा असंही म्हणाले. जणू काही दिल्लीतील नेते राऊत यांना विचारूनच निर्णय घेतात, अशा अविर्भावात ते बोलत होते, असा चिमटा राणे यांनी काढला. काय माणूस आहे हा? काय बोलतो? आधी म्हणतो 25 वर्षे राज्य करू, नंतर म्हणतो 5 वर्षे सरकार टीकेल. कोणत्या धुंदीत आहात? कोणत्या स्वप्नात आहात? की रिया चतुर्वेदींनी काय पाठवलं?, असे सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक आहेत. चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

कोणताही नेता अशा प्रकारे वक्तव्य करू शकत नाही. पण आता ते बोलत आहेत. शिवसेना आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांची काम होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेत असंतोष निर्माण झाला आहे. पुढच्या वेळेला तर 10-15 आमदारही निवडून येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नावावर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 आमदारही निवडून आले नसते. यांनी बेमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशी टीका केली. (bjp leader narayan rane attacks sanjay raut)

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते. आत्ता कुठे एका दौऱ्याला बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं. ते जास्त बोलले तर 47 वर्षात जे केलं ते सर्व बाहेर काढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आदित्यला क्लीन चिट देण्यासाठी मेळावा

कालचा दसरा मेळावा केवळ आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट देण्यासाठी होता. जनतेसाठी नव्हताच, असं सांगतानाच आम्ही दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आम्ही कधीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं नाही. त्यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्हाला बोलावं लागलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनेच कामं केली.

संबंधित बातम्या:

आज स्पष्ट बोलतोय, सुशांतची आत्महत्या नव्हे तर खून, आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील : नारायण राणे

ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय, राणेंची घणाघाती टीका

Narayan Rane | दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

(bjp leader narayan rane attacks sanjay raut)