नाशिक : ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. खरं तर जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासल्याचं हे एक वर्ष म्हणावं लागेल. महाराष्ट्राला 25 वर्ष मागे घेऊन जाणारा ठाकरे सरकारचा कारभार आहे आणि मुख्यमंत्र्यांबद्दल तर बोलायचं काम नाही. आठ ते नऊ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही ते काम उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलंय, अशी घणाघाती टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली. (Bjp Madhav Bhandari Attacked on Cm Uddhav thackeray)
ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते, प्रवक्ते राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचत आहेत. आज नाशिकमध्ये माधव भांडारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. तसंच या एक वर्षात केंद्रावर टीका करण्याखेरीज दुसरं कोणतं काम केलं हे सरकारने सांगावं, अशी खोचक टीका भांडारी यांनी केली.
“आतापर्यंतच्या इतिहासात इतकं अकार्यक्षम सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं नव्हतं. महाराष्ट्राने पहिल्यांदाच आठ महिने मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री पाहिला. या एका वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं. वाढीव वीज बिले देऊन राज्यातील जनतेची लूट केली. कोरोना काळात राज्य सरकारला समाधानकारक कामगिरी करता आली नाही”, असं टीकास्त्र भांडारी सोडलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना माधव भांडारी म्हणाले, “या देशातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या भागात उद्योग उभा राहावा यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग बाहेर जात असतील तर आपलं राज्य सरकार काय करणार हा प्रश्न आहे. सत्ताधारी पक्षाला जे काही आरोप करायचे असतील तर त्यांनी पुरावे देऊन करावेत, असं भांडारी म्हणाले.
राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते वारंवार जीएसटी परताव्यावरुन केंद्रावर टीका करत असतात. पण मला त्यांना सांगायचंय केंद्राने त्यांची जबाबदारी झटककेली नाही. ते जीएसटीचे पैसे देणारच आहेत. पण मला प्रश्न पडतो की या एक वर्षाच्या काळात केंद्रावर आरोप करण्यापलीकडे राज्य सरकारने काय काम केलं, ते त्यांनी सांगावं, असंही भांडारी म्हणाले.
(Bjp Madhav Bhandari Attacked on Cm Uddhav thackeray)
संबंधित बातम्या
सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र; उदयनराजेंची घणाघाती टीका